नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष राजधानी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या विशेष रेल्वे आजपासून धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
१२ मेपासून म्हणजे आजपासून रेल्वेगाड्या धावणार असून मुंबई सेन्ट्रल टर्मिनसमधून नवी दिल्लीसाठी पहिली गाडी सुटणार आहे. या गाडीचे आयआरसीटीसीवर आरक्षण सुरू होताच काही मिनिटांत तिचे आरक्षण पूर्ण झाले. १८ मे पर्यंतच्या या गाडीचे आरक्षण फुल्ल असल्याची माहिती रेल्वेने दिली. नवी दिल्लीहून मडगावसाठीही रेल्वे गाडी १५ मेपासून धावणार असून रत्नागिरी, पनवेल अन्य तीन स्थानकात थांबा दिला आहे.
रेल्वेने नवी दिल्लीतून देशभरातील विविध ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या एकूण ३० फे ऱ्या चालवण्यासाठी मंजुरी दिली. १५ मोठ्या शहरांमधून रेल्वेगाड्या धावणार आहेत. या गाडय़ांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ११ मे पासून सायंकाळी ४ वाजता सुरू झाले. मात्र या गाडय़ांची माहिती मिळवण्यात व आरक्षण करण्यात तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. संकेतस्थळही सुरू होत नव्हते. नंतर रेल्वेने आरक्षण सायंकाळी ६ वाजता सुरू करत असल्याचे स्पष्ट केले. आरक्षण सुरू होताच गाड्या हाऊसफुल्ल झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान मुंबईतून पहिली गाडी मंगळवारी सुटेल. गाडी क्रमांक ०२९५१ मुंबई सेन्ट्रल येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटणार आहे आणि नवी दिल्ली येथे बुधवारी सकाळी ९.०५ वाजता पोहोचेल. गाडी क्र मांक ०२९५२ नवी दिल्ली येथून सायंकाळी ४.५५ वाजता सुटून मुंबई सेन्ट्रलला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता पोहोचेल. या गाडय़ा दररोज धावणार आहेत.
२० डब्यांच्या वातानुकूलित गाडीत तिसरी, दुसरी आणि पहिली श्रेणी असेल. अनुक्रमे ६००, २०० आणि १८ तिकीट आरक्षण असून त्या सर्व हाऊसफुल्ल झाल्याचे सांगितले. ही गाडी सुरत, वडोदरा व कोटा येथे थांबणार आहे.