पुणे – लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अडकलेल्या 480 आदिवासी नागरिकांना नंदूरबारमधील त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी घोडेगाव आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत प्रवासाची विशेष सुविधा उपलब्ध केली होती. आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांच्या पुढाकाराने या स्थलांतरित आदिवासी नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाता आले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून रोजगार, शिक्षण, कामानिमित्त आलेले स्थलांतरित मजूर, कामगार, नागरिक, विद्यार्थी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकले. यात नंदूरबार व धुळे जिल्ह्यांतून मानिमित्त पुणे जिल्ह्यात आलेल्या स्थलांतरित आदिवासी नागरिकांचा समावेश होता. या नागरिकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी काही साधन उपलब्ध नव्हते.
अशा स्थलांतरित आदिवासी नागरिकांना आपल्या मूळगावी जाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिले होते. त्यानुसार घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील औद्योगिक विकास महामंडळ येथे काम करणारे कामगार, वीटभट्टीवर काम करणारे नागरिक, शेतमजूर, विद्यार्थी अशा 480 नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी 13 खासगी बसची सोय केली होती.