नगर -करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जामखेड येथील चार रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 40 झाली आहे.
जिल्ह्यात करोनाबाधित व्यक्तींची संख्या 53 असून, त्यापैकी आता 10 जणांवर उपचार सुरू आहे, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. जामखेड येथील चार रुग्णांचे 14 दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बूथ हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिकांनी त्यांना निरोप देऊन आरोग्य चांगले राखण्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
या रुग्णांनीही त्यांच्यावर चांगले उपचार आणि योग्य काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. काल नेवासा येथील रुग्णाचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. आतापर्यंत एकूण एक हजार 750 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक हजार 658 स्त्राव निगेटिव्ह आले, तर 53 व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. आता 40 व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.
सध्या नऊ रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये, तर एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. यात पाथर्डी, जामखेड, संगमनेर येथील प्रत्येकी एक आणि धांदरफळ येथील सात रुग्णांचा समावेश आहे. कोपरगाव, जामखेड आणि धांदरफळ येथील तिघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले 25 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांचे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले.
यात, जामखेड येथील एका करोनाबाधित व्यक्तीचा 14 दिवसांनंतरचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्याला आणखी सात दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. उर्वरित सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून, यात संगमनेर तीन, धांदरफळ दोन, नगर एक, श्रीरामपूर एक, जामखेड चार अहवालांचा समावेश आहे. अद्याप सात अहवालांची प्रतीक्षा आहे.