आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या शिल्पकारांची नावे इतिहासाच्या सुवर्ण पटलावर कोरली गेलेली आहेत, त्यात कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, स्वतंत्र महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. 1 जुलै ही त्यांची जयंती “कृषिदिन’ म्हणून साजरी केली जाते.
5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 म्हणजे सलग 11 वर्षांहून अधिक काळ ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिले. वसंतराव नाईक यांची कारकीर्द सुस्थिर सरकार व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरलेली आहे. त्यांना महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. वसंतरावांनी आपली जीवननौका समाजरुपी महासागराकडे वळवली. 1959 मध्ये गोरगरीबांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी पुसद येथे फुलसिंग नाईक महाविद्यालयाची स्थापना केली. प्रारंभी पुसद तालुक्यातील “आदर्श ग्राम’ चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला.
नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (1943-47). याशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. 1946 मध्ये त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नाईक 1946 मध्ये पुसद नगरपरिषदेवर निवडून आले आणि नगराध्यक्षही झाले. आपल्या कार्यकुशलतेमुळे 1952 मध्ये तत्कालीन मध्यप्रदेश विधानसभेवर पुसद मतदार संघातून ते निवडून आले आणि मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे मंत्री झाले. सन 1955 साली वसंतराव यांनी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातून व विदर्भातून हजारो एकर जमीन भूदानासाठी मिळवून दिली.
1 नोव्हेंबर 1956 रोजी यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक सहकारमंत्री झाले. 1957 साली त्यांना त्यांच्या आवडीचे कृषी खाते मिळाले. मिळालेल्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन त्यांनी कृषिसिंचन, जलसंधारण, फलोत्पादन, ग्रामविकास आणि सहकार या क्षेत्रांत भरीव कार्य केले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने कृषिक्षेत्रात परिवर्तनाला सुरुवात झाली. 1958 मध्ये जपानला गेलेल्या आंतरराष्ट्रीय राइस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला व त्यांनी जपानला भेट दिली. टोकियो येथे एफएओच्या बैठकांना ते हजर होते. 14 सप्टेंबर 1959 मध्ये चीन सरकारच्या नियंत्रणावरून चीन भेटीला रवाना झाले. त्यांनी कृषिविषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेतीपिकांच्या संकरित वाणांचा अभ्यास करून तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर नाईक हे महसूलमंत्री झाले. त्यांनी “पंचायतराज’ची मुहूर्तमेढ रोवली. 1962 सालच्या भारत-चीन युद्धामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. त्यावेळी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला बोलावून त्यांच्याकडे संरक्षणमंत्री पदाची धुरा सुपुर्द केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी दादासाहेब कन्नमवार यांची निवड झाली. 1962 मध्ये कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात वसंतराव महसूलमंत्री होते. 1963 मध्ये कन्नमवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्याच कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या तिन्ही वेळच्या कारकिर्दीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या माध्यमातून विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन लोककल्याणकारी, जनहिताचे अनेक निर्णय घेतले. या काळात जायकवाडी, उजनी, पेंच, धोम, अप्पर वर्धा अशी अनेक धरणे तर कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी, भुसावळ यांसारख्या विद्युत प्रकल्पांची उभारणी केली.
“शेतकरी सुखी झाला तर अवघा देश सुखी होईल’ असे मानून शेती आणि मातीवर श्रद्धा असणाऱ्या नाईक यांनी शेतात पाणी आणि वीज हेच सूत्र प्रमाण मानून विकासाचे कार्य केले. “शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे’ हे त्यांचे स्वप्न होते. राज्याचा औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कामाला त्यांनी गती दिली. काळ्या मातीचे हिरवे स्वप्न साकार करणारा हा महाराष्ट्राचा भूमिपूत्र म्हणत असे की, मी मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीत बसलेलो असलो तरीदेखील मी शेताच्या बांधावर बसलेलो आहे. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता, सहकारी संस्थांना बळकटी, साक्षरतेचा प्रसार, भटक्या-विमुक्तांसाठी आरक्षण, दुर्बल घटकांना सहाय्य, मुंबईतील जुन्या चाळीची पुनर्बांधणी, नवीन औरंगाबादची निर्मिती, सिडकोची निर्मिती, चार कृषी विद्यापीठांची स्थापना, कापूस एकाधिकार योजना, कुक्कुटपालन, दुग्धपालन, फलोत्पादन, “पाणी अडवा, पाणी जिरवा’, हरितक्रांती, धवलक्रांती यांसारख्या अनेक विकास योजनांची अंमलबजावणी केली.
वसंतरावांनी आपल्या कार्यकाळात सामाजिकदृष्ट्या पुरोगामी, औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा महाराष्ट्राची उभारणी केली. कोयना धरण परिसरातील भूकंपाच्या वेळी अतिशय संवेदनशीलपणे यंत्रणा राबवून भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन केले. त्यांच्याबाबतीत नोकरशाहीलासुद्धा विश्वास वाटत असे. सनदी अधिकारी आणि मंत्री यांनी एकत्र येऊन सामंजस्याने कसं काम करावं, प्रशासनाचा गाडा सुव्यवस्थितपणे कसा चालवला जाऊ शकतो याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे वसंतराव नाईक हे होत.
नवी मुंबईची निर्मिती ही वसंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानले जाते. उद्योगपतींना महाराष्ट्राकडे आकर्षित करणं, देशी, विदेशी आणि राज्यातली गुंतवणूक आकर्षित करून घेणे हे काम नाईक यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग औद्योगिक विकास महामंडळ राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळ अशा अनेक संस्था ज्या लघु उद्योगांना प्रोत्साहन देत होत्या, “सिकॉम’सारखी संस्था मोठे उद्योग, मध्यम उद्योग आणावेत यासाठी प्रयत्न करीत होती. यामागे नाईक यांच्या विकासाचा दृष्टिकोन कारणीभूत होता.
प्रा. डॉ. सुभाष राठोड