नामवंत मराठी भावगीत गायक, संगीत दिग्दर्शक, पार्श्वगायक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुधीर फडके तथा बाबूजी यांचा आज स्मृतिदिन.
सुधीर फडके यांचे मूळ नाव रामचंद्र विनायक फडके; परंतु एका मेळ्याच्या प्रसंगी त्यांच्या नावाची घोषणा सुधीर फडके अशी करण्यात आली व तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे 25 जुलै 1919 रोजी झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व मुंबई येथे झाले. तर ते लहान असतानाच त्यांच्या मातोश्री सरस्वती यांचे निधन झाले.त्यांचे वडील विनायकराव वकील होते. बालपणीच संगीतातील पहिले पाठ त्यांना ग्वाल्हेर घराण्याच्या पंडित वामनराव पाध्ये यांनी दिले.
मैहर घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या आणि शिष्या असलेल्या प्रख्यात सूरबहार वादक अन्नपूर्णादेवी यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीमुळे कोल्हापूरच्या वास्तव्यात त्यांना शिकवण्या व संगीत शिक्षकाचे काम वयाच्या चौदाव्या वर्षांपासूनच करावे लागले. मिरज येथे 1931 मध्ये त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. मुंबईच्या एका शास्त्रीय गायन स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे सुवर्णपदक त्यांना मिळाले. त्यांचा मुंबई आकाशवाणीवरचा पहिला कार्यक्रम 1937 मध्ये झाला. त्यानंतर 1939 ते 41 या काळात त्यांनी उत्तर भारतातील अनेक प्रांतांत दौरा केला व तेथील संगीताची ओळख करून घेतली.
बाबूजी संगीत देत असलेल्या “संत जनाबाई’ या चित्रपटासाठी ललिता देऊळकर यांना गाणी गायची संधी मिळाली व त्या आईसोबत पुणे येथे गेल्या. संगीत सरावाच्या दरम्यान बाबूजींचे थोरले बंधू नाना यांनी “तुमची मुलगी माझ्या भावाशी लग्न करेल का’, असे विचारले. हो-नाही असे करता करता 29 मे 1949 या दिवशी या दोघांचा विवाह झाला. या वेळी मोहमद रफी यांनी मंगलाष्टक गायले होते. दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा झाला. फडके यांनी त्यांच्या पत्नीसोबत “चली ना जैयो मोहे छोड कर’ हे हिंदी युगल गीतही गायले.
सुधीर फडके सुमारे 300 मराठी गीतांना संगीत दिले. तसेच स्वतः 250च्या वर गीते गायली. त्यांनी सुमारे 110 चित्रपटांना संगीत दिले, तर सुमारे 20 हिंदी चित्रपटांनाही संगीत दिले. मराठीशिवाय हिंदी चित्रपटातील “भाभी की चूडिया’ या चित्रपटाचे “ज्योती कलश छलके’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गीतही बाबूजींनीच संगीतबद्ध केले. ते गीत आजही लोकप्रिय आहे.
गदिमा रचित 56 गीतांचे “गीतरामायण’ हे त्यांच्या कारकिर्दीतील अजरामर सर्वोच्च बिंदू होते. रामायणात गदिमांनी प्रसंगानुरूप मातृत्व, विरह, कलह, मिलन, मत्सर, त्वेश, भक्ती, उपदेश, स्फूर्ती असे अनेक विषय जणू शब्दरूप आणले. मुक्या भावनांना या शब्दांप्रमाणे शब्दरूपात गुंफले तर बाबूजींनी त्यांना स्वररूप देऊन मूर्तस्वरूप दिले. गीतरामायणाच्या संगीतात भपकेबाजपणा नव्हता. वाद्यांचा व वादकांचा मोठा समूह नवहता. हार्मोनियम बाबूजी स्वतः वाजवायचे तसेच व्हायोलिन प्रभाकर जोग वाजवायचे, सोबत वादकांमध्ये अप्पा इनामदार, अण्णा जोशी, सुरेश हळदणकर, केशवराव बडगे यांचा समावेश होता.
गायक म्हणून फारसे प्रसिद्ध नसलेल्यांपैकी चंद्रकांत गोखले यांनी “चला राघव चला, ही जनकाची मिथिला’ तसेच योगिनी जोगळेकर यांनी “सूद घे त्यांचा लनकपाती’ हे गीत गायले आहे. 1 एप्रिल 1955 रोजी पुणे केंद्रावरून रामनवमीच्या दिवशी याचे पहिले प्रसारण झाले. त्यानंतर 56 आठवड्यांत दर रविवारी सकाळी 8 ते 9 च्या सुमारास याचे प्रसारण केले जाई. महाराष्ट्रातील सर्व कुटुंबे रेडिओभोवती जमा होत असत. बाबूजींनी स्वतः गीतरामायणाचे स्वदेशात तसेच परदेशांत सुमारे 1800 प्रयोग केले.
यशवंतराव चव्हाण यांचे बाबूजींबरोबर खूप ऋणानुबंध होते. बाबूजी त्यांची हृद्य आठवण सांगतात, “वेणूताईंना माझी गाणी खूप आवडायची. वेणूताई गेल्यानंतर यशवंतरावांच्या एकाकी जीवनात साहित्य संगीत यांनी बराच विरंगुळा दिला. वेणूताईंच्या पहिल्या वर्ष-पुण्यतिथीला त्यांनी पं. भीमसेन जोशी यांचे गायन ठेवले होते व त्याच वेळी त्यांनी निकटवर्तीयांजवळ सांगितलं की “पुढच्या वर्षश्राद्धाला सुधीर फडक्यांना बोलावून त्यांच्या गीतरामायणाचा कार्यक्रम करायचा.’ वेणूताईंचे दुसरे श्राद्ध व्हायच्या आतच यशवंतराव गेले.
“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या सत्याची विदारक प्रचिती अशी मला आली. पण हे सत्य सांगणारे गीतरामायण मी कऱ्हाड येथे 1 जून 1985 रोजी गायलो; परंतु त्यावेळी माझ्या कार्यक्रमाला नेहमी दाद देणारे वेणूताई व यशवंतराव चव्हाण या दोघांचीही आसने रिकामी होती. त्यांचा बाहेरगावी दौरा असल्यास वेणूताई असणारच. गदिमा व फडके यांच्यात मतभेद झाल्याचे कळल्यावर यशवंतराव म्हणाले, “गीताचं आणि मराठी साहित्याचं नुकसान होतंय. मतभेद असेल तर मी मध्यस्थी करतो.’ पुढे काही वर्षांनंतर गदिमा-फडके यांच्यात दिलजमाई झाल्याचे कळल्यावर त्यांना आनंद झाला.
प्रखर राष्ट्रभक्ती, ध्येयनिष्ठा, सर्जनशीलता आणि समाजसेवा हे बाबूजींच्या जीवनाचे अनोखे पैलू होत. गोवा मुक्तिसंग्रामात त्यांचा सहभाग होता. दादरा व नगरहवेली मुक्तीकरिता बाबूजी आणि त्यांच्या पत्नी ललिताताई या दोहोंचा सहभाग होता. गोवामुक्ती संग्रामातील सहभागी देशभक्त मोहन रानडे आणि तेलो मस्कारेन्हस हे दोघेही पोर्तुगालमध्ये 14 वर्षे कारावासात खितपत पडले होते. यांच्या सुटकेकरिता बाबूजींनी खूप परिश्रम घेतले.
त्यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री अण्णा दुराई यांनीही मोठी भूमिका बजावली. त्यांनी “वीर सावरकर’ चित्रपट तयार केला. “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत इंदिरा गांधी यांच्या शोकसभेत बाबूजींनी आपल्या भावपूर्ण आवाजात गाऊन श्रद्धांजली अर्पण केली होती. बाबूजी प्रामुख्याने भावगीत गायचे. ते गाताना गीतामध्ये असलेल्या भावनांना आपल्या भावपूर्ण आवाजात श्रोत्यांना भावसागराच्या समेवर नेऊन ठेवायचे. 29 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले. बाबूजींच्या पश्चात त्यांचा वारसा गायक व संगीतकार त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांनी जपला आहे.
तुझे गीत गाण्यासाठी, तोच चंद्रमा नभात, देहाची तिजोरी, संथ वाहते कृष्णामाई, उद्धवा अजब तुझे सरकार, कशी नशिबाने थट्टा आज मांडली, विठू माऊली तू माऊली जगाची, सखी मंद झाल्या, आकाशी झेप घे रे पाखरा, स्वयेश्री रामप्रभू ऐकती ही सुधीर फडके यांनी गायलेली लोकप्रिय गीते आहेत.
माधव विद्वांस