समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Maharashtra | Several feared dead after a bus burst into flames on Samruddhi Mahamarg expressway in Buldhana: Buldhana Police pic.twitter.com/Zs6Mt0tfsT
— ANI (@ANI) July 1, 2023
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
या प्रवासी बसमध्ये ३२ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात आतापर्यंत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आल आहे.
नेमका अपघात कसा घडला
प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळलेली बस आधी डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.