जयेश राणे
आज सोशल मीडियावर स्वतःचे फोटो टाकणे लाइफस्टाइल बनली आहे. मात्र, आपण पोस्ट केलेले फोटो खरंच सुरक्षित आहेत का? त्यांचा कुणी दुरुपयोग तर करीत नाही ना? अशा साध्या शंकाही कुणाच्या मनात येत नाही, त्यामुळे अनेकजण फसवले जातात.
आपण कुठे पिकनिकला गेलो, कोणत्या समारंभात सहभागी झालो, सेल्फी आदी प्रकारची छायाचित्रे सर्वप्रथम सोशल मीडियावर ठेवण्याची घाई असते. “अति घाई संकटात नेई’ हे तर घासून गुळगुळीत झालेले वाक्य आहे. पण ते माहीत असूनही प्रत्यक्षात त्याकडे कितीजण गांभीर्याने पाहतात? सोशल मीडियावर विशेषतः आपली छायाचित्रे ठेवणे म्हणजे आपली अधिकांश माहिती स्वतःहूनच इतरांना देणे होय. आजमितीस त्या छायाचित्रांचा कोण कसा दुरुपयोग करेल, करतही असेल, याची जाणीव आहे का? सायबर चाचेगिरी म्हणजे केवळ ऑनलाइन पैसे चोरणे या सीमेपर्यंतच मर्यादित आहे, या गोड गैरसमजात राहून खुशीत गाजर खाऊ नये. यामध्ये छायाचित्रे, वैयक्तिक माहिती मिळवून समोरच्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कसे त्रस्त करता येईल. यामध्ये ते चोर चपळ असतात.
साधारणपणे आवश्यक तेवढीच वैयक्तिक माहिती नोकरीसाठी मुलाखत देताना, बॅंकेत खाते उघडताना, विवाह जुळवणाऱ्या संस्था आदींना देत असतो. असे असताना सोशल मीडियावर उठसूठ स्वतःचे फोटो पोस्ट करणे म्हणजे सायबर चाच्यांसाठी आयते कुरणच म्हणावे लागेल. फोटो पोस्ट करण्यासाठी काही सेकंद लागतात. मात्र त्याचा दुरुपयोग झाल्यावर जो त्रास सहन करावा लागतो त्याचे निराकरण करण्यासाठी काही दिवस, महिनेही जातात. सोशल मीडियावर मी माझे फोटो पोस्ट केले नाही, तर मला माझे फ्रेंड्स काय म्हणतील? हा प्रश्न प्रथम उचंबळत असतो. फ्रेंड्स काय म्हणतील, हा विचार हवाच कशासाठी? संकट काळाचे ओझे स्वतःलाच वाहावे लागते. फ्रेंड्स किती दिवस धीर देणार? ते काय म्हणतील, हा विचार सोडून दिला असता, तर आज पश्चाताप करण्याची वेळ आली नसती असा विचार कालांतराने योग्य वाटू लागतो. मात्र, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सध्याचे कमीतकमी शिक्षण हे पदवीपर्यंतचे शिक्षण आहे आणि आजमितीस अनेकजण पदवीधर आहेत. पण केवळ शिक्षण असून काय उपयोग? योग्य काय-अयोग्य काय याची जाण असणेही तितकेच अत्यावश्यक आहे.
सोशल मीडियावरून अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती दिल्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांनी भावनिक होऊन वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने अनेकदा केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय; तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने “सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात या विषयावर अनेकांगांनी परामर्श घेण्यात आला. गोड बोलून, मी कसा अडचणीत आहे हे भासवून, मला इतरांना कसे साहाय्य करायचे आहे याचा आव आणून सोशल मीडियावर भावनिक जाळे टाकून स्त्रियांना फसवल्याची कित्येक प्रकरणे उजेडात आलेली आहेत. त्यांना चाप लावण्यासाठी स्त्रियांनीच पुढाकार घेणे निकडीचे आहे.
सोशल मीडियावरून भावनिक साद घालून मैत्री करण्याचे नाटक करणे, काही लबाडांच्या हातचा मळ आहे. किंबहूना त्यांचा तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यवसायच म्हणता येईल. स्त्रीचे छायाचित्र पाहून तिला फेसबुकवर फ्रेंड रिकवेस्ट पाठवणे, व्हॉट्सऍप क्रमांक मिळाल्यास त्यावर मेसेज पाठवायचे आदी प्रकार समोरच्या व्यक्तीला आपल्या संपर्कात आणण्यासाठी धडपड केली जाते. संपर्कात आल्यावर अनावश्यक मेसेजेसचा भडीमार सुरू होतो. ज्याला आपण कधी भेटलोच नाही, पूर्णपणे ओळखतही नाही अशा कोणा ऐरागैऱ्याला स्वतःची माहिती देणे म्हणजे शुद्ध मूर्खपणाच म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे सुशिक्षित लोकांच्या अडाणीपणाची ही परिसीमा आहे, असे का म्हणू नये? स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याला असेच बोलणे सटीक ठरते.
पोलीस, घरातील ज्येष्ठ मंडळी सोशल मीडियाच्या दुरूपयोगाविषयी वारंवार सतर्क करत असतात. मात्र त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करून स्वतःचेच खरे केले जाते. सोशल मीडियावर स्वतःची छायाचित्रे पोस्ट करून काय फलनिष्पत्ती मिळते? हा एक प्रश्नच आहे. ज्यांनी या माध्यमाचा वाईट अनुभव घेतला आहे, ते पुन्हा चुकूनही आधी केलेली घोडचूक करणार नाहीत. मात्र त्या चुका नव्याने करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत असल्याने त्यांची फसवणूक करणाऱ्यांचे मनोबल उंचावत आहे. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा’, असे म्हटले जाते. लक्षात घेण्याचा मुद्दा हाच आहे की सोशल मीडियावर स्त्रियांनी स्वतःची छायाचित्रे ठेवू नये आणि स्वतःच्या अडचणींसाठी स्वतःच मार्ग बनवून देऊ नये.