आई ही व्यक्तीच देवाने किती छान बनवलीय ना? खरं तर आई या शब्दातच जगातली सारी माया, सारं प्रेम, सारं वात्सल्य दाटलेलं आहे, असं वाटतंय.
आपण कितीही मोठे झालो तरी आईनं मात्र तसंच तेवढेच आपल्या आठवणीतल्या छान आईसारखं रहावं असं आपल्याला वाटत असतं. नुसतं तिने तसेच रहावं असं नाही तर तिने कधीसुद्धा आजारी पण पडू नये असंच वाटतं. कारण आई आजारी पडली की, सगळं घरच आजारी पडतं असं मला नेहमी वाटतं.
बाकीचं जाऊ देत पण काही दिवसांपूर्वी माझी अगदी चंगळच होती.
कशी ते सांगते. त्याचं काय झालं की, माझ्या ऑफिसची वेळ बदलून सकाळ संध्याकाळ झाली होती. त्यामुळे मधल्या वेळेत मी घरी येऊ शकत होते. पण मला ताप आल्याने तब्येत बरी नव्हती. चांगली आठवडाभर घरी रहावं लागणार होतं म्हणून आई माझ्याकडे रहायला आली होती. मी घरात थोडं थोडं काम करू लागले होते, पण घरात बाकीची कामं काय कमी असतात का? पण ही सगळी बाकीची कामं माझी आई आनंदानं करत होती. पण मला छान बरं वाटू लागल्यावर मात्र मी तिला सक्तीनं विश्रांती घ्यायला लावली.
आज माझी आई 80 वर्षांची झालीयं. तिच्या वयाच्या मानानं तिची तब्येत खूपच चांगली आहे. अक्षरशः दिवसभर तिचा काहीतरी गृहोद्योग चाललेला असतो. सारखं ती विणत तरी असते, शिवणकामातून उरलेल्या तुकड्यांना चिमण्यांचा आकार देऊन त्यांना हातानं शिवून त्यांच्यामध्ये जुन्या चिंध्या बारीकसारीक कापून भरून फार सुंदर अशा चिमण्या तयार करून पडद्यावर लावण्यासाठी छानशा चिमण्यांच्या माळा तरी तयार करते.
त्यांना छान मणी टिकल्या लावल्या की त्या चिमण्या इतक्या देखण्या दिसतात की आईनं जुन्या किंवा उरलेल्या कापडातून बनवल्या आहेत अशी शंकासुद्धा येत नाही इतका तिचा या बाबतीत हातखंडा आहे. या चिमण्याच करणे असं नाही पण एखादा नवा पदार्थ किंवा एखादी नवी वस्तू पाहिली की ती लवकरात लवकर करून बघण्याची उभारी किंवा हुरुप तिला या वयातही आहे आणि हा हुरुप कौतुकास्पद नक्कीच आहे.
आयुष्यामध्ये आलेल्या अनेक संकटांना तोंड देऊन परत नव्या जोमाने नव्या आशेने कसं उभं राहायचं याचा वस्तुपाठच आम्हाला तिच्याकडून मिळालेला आहे. मी बरी झाल्यावर सकाळी सगळा स्वयंपाक करून जात होते तरी मी मधल्या वेळेत जेवायला येते. मी एकटी असल्यावर जेवायला घरी येते तेव्हा केलेले पदार्थ परत गरम न करता जेवण कसंबसं उरकते. आई घरी होती तेव्हा ती माझ्या येण्याची वाट बघत असायची.
मी घरात शिरतानाच छानसा आमटी उकळण्याचा वास येत असायचा. छान जेवण्याची तयारी केलेली असायची. गरमगरम अन्न आणि आईचं असणं या दोन गोष्टीच इतक्या छान होत्या की काय सांगू! खरंच मी त्यावेळी व्यवस्थित जेवायची. जेवण उरकायची नाही कारण आईची माया, प्रेम, ओढ सारे त्या गरम अन्नात पुरेपूर भरलेलं असायचं. आपलं लेकरू ऑफिसमधून दमूनभागून येतं.
त्याच्या पोटात गरमगरम चार घास जावेत हीच या माऊलीची इच्छा असायची.
नकळत ते सारे बघून माझे डोळे भरून यायचे. कधीकधी वाटायचंसुद्धा स्वार्थीपणानं की आई आपल्याकडेच कायम का राहत नाही? पण मुलगा असल्यावर मुलीकडे कुठल्या आईला रहायला आवडेल, कारण शक्य तोवर जावयाकडे भार होऊन रहायचे नाही असं सगळ्या जुन्या लोकांचं मत असतं.