जगनियंत्याला एकट्या पुरूषाने जग चालणार नाही असं वाटल्यामुळे पुरूषाच्या अर्ध्या अंगातून स्त्री निर्माण केली. या सगळ्या प्रकारात पुरूष अपूर्ण झाला. स्त्री मात्र पूर्णत्वाला पोचली. निर्मितीचा स्रोत बनली.
निर्मात्याने सृष्टी निर्माण केली आणि ती सुचारू पद्धतीने चालविण्यासाठी स्त्री-पुरुषाची निर्मिती केली. आपापली कामं आणि कार्य जबाबदारीने केली, तर परिस्थितीचा, मनःस्थितीचा तोल बिघडत नाही. बराच काळ एकमेकांचा सन्मान, आदर करत सृष्टीचे चक्र नियमितरित्या सुरू होते. निसर्गदेखील आपल्या आखून दिलेल्या क्रमाने मार्ग आचरित होता. एक शांतता आणि मनःस्वास्थ्य होते. मात्र, कालोघात स्पर्धा वाढल्या, हेवेदावे वाढले. स्वत:चा मोठेपणा गाजवण्यासाठी, सत्तेसाठी स्पर्धा वाढली.
पराक्रमाच्या स्पर्धा, सौंदर्याच्या स्पर्धा, चढाओढ, सार्वभौमत्त्व या स्वभावाच्या छटा सर्वदूर उमटू लागल्या. आपलेपणा, स्वामीनिष्ठा, बंडखोरी हे सर्व वाढीला लागले. आपले प्रेम, जिव्हाळा, निष्ठा हे गुणधर्म अधोगतीला जाऊ लागले. सृष्टीचा समतोल बिघडू लागला. आता तर काय कलीयुग आहे. या कलीयुगात काय काय होणार, हे पाहावं लागेल. पण कलीयुग असलं तरी मानवी शरीर नाही बदलले. मन नाही बदलले. फरक निश्चितच पडला. पण तो काही प्रमाणात सकारात्मक तर काही प्रमाणात नकारात्मक पडलेला आहे.
प्रजोत्पादन करण्याची जबाबदारी निसर्गाने स्त्रीला बहाल केली. जग सुरू झाले. इथेच पुरुषाचा अहंभाव जागृत झाला. वास्तविक निर्मिती प्रक्रियेत स्त्रीपुरुषांचे परस्परपूरक आणि सहयोगाचे एकत्र योगदान आहे. मात्र संर्वधन पालनपोषणाची जबाबदारी, गर्भस्थ शिशुची जबाबदारी स्त्रीची आहे. म्हणूनच तिला सृजनशील म्हटले गेले आहे. एक जीव ती 9 महिने पोटात वाढविते. जणू काही ती एक जग निर्माण करते. त्या 9 महिन्यांच्या काळात तिच्या जगाची लोकसंख्या फक्त दोनच असते. ती स्वत: आणि तिचे बाळं! या निर्मितीच्या काळाची ओढ तिला समज येऊ लागल्यापासूनच लागलेली असते.
स्त्री नेहमीच म्हणजे, अगदी बालपणापासून तिच्या भावविश्वातील संसारात रमलेली असते. तिला समज येताच तिची आई तिला सर्व गोष्टींची कल्पना देते. कारण तिलासुद्धा तिच्या आईने ती समज दिलेली असते. अशा या समजेला खूप काळाची परंपरा आहे. अर्थातच या सृजनशीलतेच्या प्रक्रियेत एक वडील म्हणून पुरुषाची अनिवार्यता आहेच. संसाररथाला दोन चाकं असतात. त्यापैकी एक चाक वडील (पुरुष) आणि दुसरे चाक आई (स्त्री) असते. समन्वयता, मधुरता, आपसी प्रेम जिथे असते तिथे यशस्विता, सामंजस्य आणि आनंद असतो. बऱ्याच काळापर्यंत ही समाजव्यवस्था होती. सृष्टीचे चक्र सुचारू रूपात सुरू होते.
दिवसागणिक समाजव्यवस्था बदलू लागली. पुरुषप्रधान संस्कृतीवर समान हक्कामुळे असमाधान निर्माण होऊ लागले. वैदिक पौराणिक काळापासून स्त्रिया शिक्षित होत्या. गाढ्या पंडित होत्या. पण अहंमन्यता नव्हती. कालांतराने फरक पडत गेला. जसजशी हक्कांची जाणीव स्त्रियांना होत गेली तसतशी व्यक्तिस्वातंत्र्य ही कल्पना दृढ होत गेली, तसतशी परिस्थिती बदलत गेली. स्त्री नेहमीच सकारात्मक आणि सहनशील राहिली. निसर्गाने बहाल केलेले मृदुला जपत राहिली. शारीरिक मानसिक बदल स्वीकारणे त्यानुसार स्वत:ला तयार करणे, अतोनात प्रामाणिक वेदना सोसून बाळाला जन्माला घालणे, हे कठोर काम ती सहजच लीलया करते.
शिशुंसगोपन सोपे नाही. रात्रीचा दिवस करावा लागतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. चारजणांच्या घरात मुलांचे संगोपन विभागले जायचे. आज “हम दो, हमारे दो’ या संसारात मुलं एकटी वाढतात. काही वेळेला पुरुषाकडून त्याच्या जबाबदारीची अवहेलना होते. अशा वेळी घर, संसार, शिशुसंगोपन, प्रसंगी नोकरी या सर्व कामांची जबाबदारी एकट्या स्त्रीवर येते. अशा वेळी तिच्या जगाच्या कक्षा रुंदावतात. आईपणाच्या जबाबदारी सोबत वडीलपणाची जबाबदारी सांभाळावी लागते. यावेळी तिच्या धैर्याची, सहनशीलतेची कसोटी खरेपणावर उतरते. निसर्गानेच तिला सहावे सहनशीलता नावाचे इंद्रिय बदल केलेले आहे. यावेळी ती त्याचा पुरेपूर उपयोग करते. स्वत: घायाळ होईल पण आपल्या जबाबदाऱ्या निश्चयाने पूर्ण करते.
आजची स्त्री सबला आहे. सक्षम आहे, निर्भया आहे. जननी आहे, सैनिक आहे, वैज्ञानिक आहे. पुरुषाच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा प्रसंगी अग्रेसर आहे. हाच तिचा गुणसंग्रह पुरुषाला तिच्याप्रती मत्सर वाटण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. हेच त्यांच्यातील कलहाचे कारण असते. या कलहाने आज रौद्ररूप धारण केले आहे. स्त्रीविषयीची अतीव तिरस्काराची भावना किती पराकोटीला जाऊ शकते, याची उदाहरणं आपण रोजच वर्तमानपत्रात वाचत असतो. अल्पवयीन गुन्हेगार पाहतो. एकाच वेळी अत्याचारपीडित स्त्री विषयी सहानुभूती वाटते तर त्याचवेळी अल्पवयीन गुन्हेगारीविषयी काही प्रमाणात दया वाटते. कारण त्यांची वय पाहता त्यांनी केलेले भीषण गुन्हे याचा समन्वय घालणे फार कठीण असतं. हे कसं, काय घडतं या विचारांची भूतं मनाला क्लेश देतात. इतकी यांची मानसिकता विकृत कशी होऊ शकते, हा विचारही करवत नाही.
ताराबाई मोडकांचे एक वाक्य या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखे आहे. त्या म्हणतात, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. मनाने मुक्त असणं, हेच खरे स्वातंत्र्याचे गमक आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये अतिशय तरल म्हणजे न दिसणारी रेषा आहे. जणूकाही ती तिची लक्ष्मणरेषा आहे. ती जर नाही ओलांडली गेली तर तिच्या स्वातंत्र्याला कशाचाच धक्का बसणार नाही. तिचं भावविश्व, उद्ध्वस्त होणार नाही. ती सक्षम आहे. धैर्यवान आहे.
अधिक चांगल्या प्रकारे आपापली जबाबदारी सांभाळू शकेल. सर्जनशीलता अधिक वाढीला लागेल. पुरुषाला कधी माता, कधी पत्नी, कधी बहीण, कधी मुलगी, कधी मैत्रीण अशा सगळ्या नात्यांत ती हवी असते. पुरुष तिच्याविना अधुरा आहे. ती मात्र पूर्ण आहे. रेखा न ओलांडता ती आपले पूर्णत्व अधिक योग्य पद्धतीने सिद्ध करू शकते आणि त्या पूर्णत्वाचा योग्य वापर जगाच्या कल्याणाकरिता करू शकते.
अरुणा सरनाईक