– शुभांगी भोसले
सनईसारख्या अवघड वाद्यातील सुरावट अत्यंत नजाकतीने सादर करणारे भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची आज 108वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्ताने लेख…
सनईला बिस्मिल्ला खाँ यांनी पारंपरिक शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या मखमली गालीचावरच नेऊन बसविले नाही, तर या भारतीय वाद्याला जगप्रसिद्ध केले. बिस्मिल्ला खाँ यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आणि पहिल्या प्रजासत्ताक दिनी सनईवादन करून देशवासियांना मंत्रमुग्ध केले होते. धार्मिक सौहार्दाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्या बिस्मिल्ला खाँ यांच्यासाठी संगीत हेच जीवन होते. वाराणसीच्या मंदिरात आणि गंगेच्या घाटावर सनईवादन करणारे बिस्मिल्ला खाँ संगीताचे सच्चे अनुयायी होते. कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या ‘सनादी अप्पण्णा’ या चित्रपटासाठी त्यांनी सनईवादन केले.
भारतातील प्रख्यात सनई (शहनाई) वादक बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म बिहारमधील डुमराव या गावी 21 मार्च 1916 रोजी एका संगीतकार कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पैगम्बर खाँ आणि आईचे नाव मिट्ठन बाई होते. त्यांचे लहानपणीचे नाव कमरुद्दीन होते तथापि पुढे त्यांच्या आजोबांनी त्यांना ‘बिस्मिल्ला’ म्हणण्यास सुरुवात केली आणि पुढे त्याच नावाने जग त्यांना ओळखू लागले. खाँ यांचे पूर्वज मुघल काळात बिहारच्या भोजपूरमध्ये सरदारांच्या महालात वादक म्हणून आपली कला सादर करीत असत. बिस्मिल्ला खाँ यांचे वडील बिहारच्या डुमराव रियासतचे महाराजा केशव प्रसाद सिंह यांच्या दरबारात सनईवादन करायचे.
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच खाँ यांनी त्यांचे मामा सनईवादक अली बक्ष विलायतु यांच्याकडून उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथे सनईवादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. दरम्यान, मामांबरोबर त्यांची साथ करण्यासाठी ते लग्नसमारंभात तसेच संगीत संमेलनात जाऊ लागले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी अलाहाबाद येथील अखिल भारतीय संगीत परिषदेत (1930) पहिल्यांदा सनईवादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला. त्यानंतर लखनौ येथे झालेल्या संगीत संमेलनात उत्तम वादनाबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले.
1937 साली कोलकात्यातील अखिल भारतीय संगीत परिषदेमध्ये सनईचे वादन करून त्यांनी सुवर्णपदके मिळविली. याच संमेलनातून बेगम अख्तर यांनीही आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बिस्मिल्ला खान आणि बेगम अख्तर हे एकमेकांचे शिष्य बनले. 1938 साली त्यांचा लखनौ रेडिओ केंद्रावर प्रथम कार्यक्रम सादर झाला आणि त्यानंतर त्यांच्या सनई वादनाच्या उज्ज्वल कारकिर्दीला सुरुवात झाली. 1940 साली त्यांनी त्यांच्या बंधू समवेत संगीत मंडळ स्थापन करून कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांनी प्रथम श्रेणीचे सनईवादक म्हणून लौकिक प्राप्त केला.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित नेहरूंच्या उपस्थितीत त्यांनी सनईचं वादन केले होते. त्याचसोबत, कान्स आर्ट फेस्टिव्हल, ओसाका ट्रेड फेअर, वर्ल्ड एक्स्पोझिशन, वर्ल्ड म्युझिक इन्स्टिट्युट इत्यादी अनेक सोहळ्यांमध्येही त्यांनी सनई वादन केले आहे. बिस्मिल्ला खान आणि त्यांच्या साथीदारांनी सनई वादनातून स्वतंत्र भारताच्या पहाटेचं स्वागत केले. 1997 साली ज्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला गेला, त्यावेळीही लाल किल्ल्यावर बिस्मिल्ला खान यांनी सनई वादन केले होते. बिस्मिल्ला खाँ आणि महान सतारवादक उस्ताद विलायत खान यांच्यात अनोखं नातं होतं. जेव्हा कधी जुगलबंदीची वेळ येत असे, तेव्हा विलायत खान हे बिस्मिल्ला खाँ यांच्यासोबत सतार वाजवणं पसंत करत. एकदा विलायत खान यांनी बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल म्हटलं होतं, ‘माझा आणि बिस्मिल्ला खाँ यांचा आत्मा एकच आहे’.
बिस्मिल्ला खाँ यांना सिनेमे पाहण्याची आवड होती. सुलोचना या त्यांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या. 1959 साली त्यांनी ‘गूँज उठी शहनाई’ या सिनेमात संगीत दिग्दर्शनही केले होते. ‘दिल का खिलौना हाए टूट गया’ या गाण्याला बिस्मिल्ला खाँ यांनी संगीत दिले होते. यशाने अक्षरश: त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं होतं. मात्र, त्यांच्या जीवनशैलीत यामुळे अजिबात बदल झाला नाही. साधी राहणीच ते पसंत करत. बिस्मिल्ला खाँ यांनी आयुष्यभर स्वत:चे कपडे स्वत:च धुतले. इस्त्री न करताच ते कपडे घालायचे. एक पलंग आणि एक खुर्ची यापलिकडे त्यांच्या खोलीत काहीच नव्हतं. त्यांनी कधीच कार खरेदी केली नाही.
रिक्षानेच जात. कधीच दारू प्यायले नाहीत. एकदा बिस्मिल्ला खाँ यांच्या चाहत्यानं त्यांच्या घरात कूलर लावण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, बिस्मिल्ला खाँ यांनी त्यास नकार दिला आणि तो सर्व पैसा गरीब विधवांना देण्यास सांगितलं. जागतिक स्तरावर धर्मनिरपेक्ष भारताची ओळख म्हणून बिस्मिल्ला खाँ हे अभिमानाने वावरले. जगाच्या कानाकोपर्यात त्यांच्या सनईचे सूर पोहोचले आणि लाखो लोक त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध झाले.
त्यांचा भारतरत्न (2001), पद्मविभूषण (1980), पद्मभूषण (1968), पद्मश्री (1961), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (1994), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1956), तानसेन पुरस्कार आदी अनेक मानद पुरस्कारांनी गौरव झाला आहे. इराण सरकारकडून देण्यात येणार्या ‘तलार मौसिक’ या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्व भारती विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेटही देण्यात आली. 21 ऑगस्ट 2006 रोजी बिस्मिल्ला खाँ यांचा मृत्यू झाला.