माइंडमॅप ऍडव्हान्स या संस्थेतर्फे दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू या शहरांमधील अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार बहुतांश कर्मचारी लॉकडाऊननंतर पुन्हा कामावर जाण्याच्या मुद्द्यावरून चिंतेत असल्याचे दिसून आले आहे. करोनाचे आव्हान लक्षात घेऊन कार्यालयीन कामकाजाची फेररचना करणे आणि जाणकारांच्या सल्ल्यानुसार कार्यालयाची रचना करणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा कामावर जायचे, या कल्पनेने खासगी कंपन्यांचे बहुतांश कर्मचारी तणावाखाली आहेत. कामाच्या ठिकाणी आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेतली जाईल की नाही, याबाबत त्यांना शंका आहे. खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 93 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पुन्हा कामावर जाण्याच्या कल्पनेने आम्हाला तीव्र तणाव आला आहे. लॉकडाऊन सुरू असताना गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कामांना टप्प्याटप्प्याने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 17 मेनंतर लॉकडाऊन पुढे वाढणार नाही, अशी सकारात्मक भावना निर्माण झाली असून, जरी लॉकडाऊनचा कालावधी त्यापुढेही वाढला तरी आणखीही अनेक कामांना परवानगी दिली जाईल, अशी शक्यता आहे. सरकारी कार्यालये तर आता सुरू झालीच आहेत. आता खासगी कार्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. अनेक क्षेत्रांमधील कार्यालयीन कामकाज सुरू होण्याची गरज आहे. अशा वातावरणात खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात लॉकडाऊननंतरच्या स्थितीविषयी अनेक शंकाकुशंका येत आहेत.
सर्वेक्षणानुसार, आपण पुन्हा कामावर जाऊ लागण्यापूर्वी कार्यालयीन परिसर काळजीपूर्वक सॅनिटाइज केला जावा अशी 85 टक्के कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. माइंडमॅप ऍडव्हान्स या संस्थेद्वारे दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू या शहरांमधील छोट्या, मध्यम आणि मोठ्या अशा एकंदर 560 कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 85 टक्के पुरुष आणि 15 टक्के महिला कर्मचाऱ्यांचे विचार सर्वेक्षणाद्वारे नोंदवून घेण्यात आले. 59 टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याची चिंता वाटते, तर 25 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते आपल्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घाबरलेले आहेत. उर्वरित 16 टक्के कर्मचाऱ्यांना या अपत्तीचा अवधी आणखी दीर्घकाळ ताणला जाण्याची भीती वाटते. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर ज्या वेगाने बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढताना दिसला, तो जमेस धरता हा संसर्ग एवढ्या लवकर आपला पिच्छा सोडणार नाही, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. हे वास्तव तर जागतिक आरोग्य संघटनेनेही स्वीकारले आहे. यापुढे करोना विषाणूंसोबत जगणे शिकावे लागेल, ही बाब आता बहुतांश लोकांनी मान्य केली आहे.
असे असले तरी लॉकडाऊनला एक सीमा निश्चितच आहे. सामाजिक, आर्थिक घडामोडींवरील मर्यादा फार दीर्घकाळ वाढविता येणार नाही. कधी ना कधी, किंबहुना शक्य तेवढ्या लवकर आपल्याला कार्यालये आणि कारखाने सुरू करावेच लागतील. काही कंपन्यांनी “वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारला असला, तरी त्यालाही मर्यादा आहेत. अनेक कामे अशी आहेत, ज्यासाठी कार्यालये उघडावीच लागतील. या पार्श्वभूमीवर, कर्मचाऱ्यांना वाटत असलेली चिंता वाजवीही आहे. सर्व कंपन्यांनी आणि त्यांच्या संचालकांनी आपल्या कार्यालयाच्या स्वरूपात आणि कार्यपद्धतीत नव्या आव्हानाच्या अनुरूप बदल करावे लागतील. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नवे आराखडे तयार करावे लागतील.
ज्याप्रमाणे कार्यालयांमध्ये आग किंवा अन्य आपत्तींचा मुकाबला करण्यासाठीच्या उपाययोजना असतात, तशाच आता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठीही आणीबाणीच्या उपाययोजना कराव्या लागतील. कार्यालयातील आसन व्यवस्थेपासून कामाच्या पाळीपर्यंत तसेच अन्य अनेक बाबीही या आव्हानाचा विचार करून निश्चित कराव्या लागतील. अशा आवश्यक बदलांच्या बाबतीत काही निकषसुद्धा निश्चित करावे लागतील. तरच कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती कमी होईल आणि काम पूर्ववत सुरू होऊ शकेल.
– मेघना ठक्कर