माधव विद्वांस
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते व पटकथाकार चित्रपती व्ही. शांताराम त्यांचे आज पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने…
व्ही. शांताराम यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथे झाला व शालेय शिक्षण कोल्हापूर येथेच झाले. त्यांच्या वडिलांचे छोटे किराणा मालाचे दुकान होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम नव्हती, त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर सुरुवातीला शांताराम यांनी अल्प वेतनावर नोकरी केली. अशा अडचणीच्या काळातच ते चित्रपट, बालगंधर्वांची नाटके, भारतीय व पाश्चात्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले.
त्यांच्या जवळ असलेला आत्मविश्वास आणि परिश्रम करण्याची जिद्द, कल्पकता यांमुळे ते श्रेष्ठ दिग्दर्शक बनले. वर्ष 1914 मध्ये त्यांनी बालगंधर्वांच्या “गंधर्व नाटक मंडळी’त नट म्हणून रंगभूमीवर पाऊल ठेवले. वर्ष 1920 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रभावित होऊन कोल्हापूरला बाबूराव पेंटर यांनी स्थापलेल्या “महाराष्ट्र फिल्म कंपनी’त ते
दाखल झाले व रूपेरी पडद्याशी त्यांचा संबंध आला. त्यांनी चित्रपट निर्मितीमधील नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये अशा प्रत्येक शाखेतील कामाचा सखोल अभ्यास केला. महाराष्ट्र फिल्म कंपनीत काम करीत असतानाच बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे “व्ही. शांताराम’ असे नामकरण केले.
त्या काळी महाराष्ट्र फिल्म कंपनीने अनेक मूकपट काढले. वर्ष 1921 मध्ये “सुरेखाहरण’ या पौराणिक मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रूपेरी पडद्यावर प्रवेश केला. वर्ष 1925 मध्ये प्रदर्शित झालेल्या “सावकारी पाश’ या चित्रपटाने ते खूपच प्रभावित झाले होते व त्यांच्या मनात आपणही निर्मिती व दिग्दर्शन करावे असे विचार येऊ लागले.
वर्ष 1929 मध्ये कोल्हापूर येथे “प्रभात’ फिल्म कंपनीची स्थापना झाली. या नव्या कंपनीने व्ही. शांताराम यांच्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविली व त्यांनी गोपाळकृष्ण, खुनी खंजर, रानीसाहिबा, उदयकाल, जुलूम, चंद्रसेना इ. पौराणिक व देमार (स्टंट) मूकपट निर्माण केले. वर्ष 1932 मध्ये “अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट शांतारामबापूंच्या दिग्दर्शनाखाली निर्माण करण्यात आला.
वर्ष 1942 मध्ये व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि “राजकमल कला मंदिर’ या चित्रसंस्थेची स्थापना केली. “शकुंतला’ हा राजकमलचा पहिला चित्रपट वर्ष 1943 मध्ये निर्माण झाला. हा हिंदी चित्रपट मुंबईच्या स्वस्तिक चित्रपटगृहात 104 आठवडे चालला. अमेरिकेत व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळजवळ 80 चित्रपटांची निर्मिती केली, तर सुमारे 60 चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
दो आँखे बारा हात, होनाजी बाळा, पिंजरा या सारखे संगीत व नृत्यप्रधान तसेच मराठीतील तमाशापटांची त्यांनी निर्मिती केली. त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या यशस्वी चित्रपटांची यादी खूपच मोठी आहे. आचार्य अत्रे यांनी त्यांना “चित्रपती’ ही उपाधी दिली. ते चित्रपटाची कथा व त्याला साजेशी गीते व नृत्य याबाबतीत खूपच चोखंदळ होते.
त्याबाबत गीतकार जगदीश खेबुडकर सांगतात की, त्यांनी “पिंजरा’ या चित्रपटासाठी 110 गाणी लिहून दिली होती व त्यातील फक्त 11 गाणी निवडली गेली. त्यांचेकडे गीते लिहिण्याची जबाबदारी सोपविताना चित्रमहर्षींनी खेबुडकरांना विचारले, तुम्ही ज्यांना गुरू मानता अशा ग. दि. माडगूळकरांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बसवू इच्छितो, तुम्हाला जमेल का?
त्यावर खेबूडकरांनी उत्तर दिले, कोल्हापुरी मातीचा अभिमान आणि तुमचा विश्वास व्यर्थ घालवणार नाही. पिंजरा या चित्रपटातील सर्व गाणी संपूर्ण महाराष्ट्रात रसिकांच्या मनात आजही खोलवर रुजली आहेत. पिंजऱ्यातील गाणी, नृत्य संवाद इतके प्रभावीपणे सादर केले गेले की शांतारामबापूंनी सर्व महाराष्ट्राला जणू पिंजऱ्यात बंद करून टाकले होते. वर्ष 1972 मध्ये मराठीतला सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून “पिंजरा’ ओळखला जातो.
या चित्रपटातील “तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल’, या लावणी प्रकारातील गाण्यासाठी शांतारामबापूंनी खेबुडकरांकडून 49 गीते लिहून घेतली होती. मात्र त्यांना एकही पसंत पडले नाही. त्यामुळे खेबुडकर अस्वस्थ झाले होते. त्यांना खूप विचार केल्यावर एक रचना सुचली, लगेचच त्यांनी रात्री दोन वाजता शांतारामबापूंना फोन करून लावणी ऐकविली व ती लगेचच बापूंचे पसंतीस उतरली व त्यांनी लगेचच व्वा, झक्कास, खेबुडकरजी अशी कौतुकाची शाब्बासकी दिली होती.
त्यांनी चित्रपटकला आणि तंत्र यांच्या विकासासाठी वर्ष 1977 मध्ये व्ही. शांताराम चलतचित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान, ही सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केली. चित्रपट व्यवसायास उपयुक्त अशी यंत्रसामग्री तयार करणे, तसेच समाजाभिमुख व नावीन्यपूर्ण चित्रपट आणि चांगले बालचित्रपट यांना “राजकमल’तर्फे सुवर्ण व रौप्य बोधचिन्हे आणि रोख रकमेची पारितोषिके देऊन त्याद्वारे निर्माते व दिग्दर्शक यांना उत्कृष्ट रंजक चित्रपटनिर्मितीसाठी प्रोत्साहन देणे, हे संस्थेचे उद्दिष्ट होते.
अतिशय साधी राहणी, कडक शिस्त तसेच कलाकारांच्या अडचणींचा विचार करून कामाच्या वेळा ते ठरवीत असत. 30 ऑक्टोबर 1990 रोजी त्यांचे निधन झाले. “शांतारामा’ हे त्यांचे आत्मचरित्र. या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या कार्याचा सुंदर मागोवा घेतला आहे. हे आत्मचरित्र सिनेसृष्टीत नव्याने काम करणाऱ्यास दीपस्तंभासारखे आहे.