वर्षानुवर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरू आहे. मुसळधार पाऊस, वादळ, बॉम्बहल्ले तथा आतंकवादी हल्ल्यांमुळे यात्रेकरू थांबले नाहीत, उलट दिवसेंदिवस यात्रेकरूंच्या संख्येत भरच पडत आहे.
अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीमुळे सुमारे 15 हजार यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे पुरात अडकलेल्या आणि चिखलगाळाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यामुळे प्रत्येक यात्रेकरूला “रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड’ दिलेले आहे. त्याद्वारेही या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला गेला. पुरामुळे अनेक तंबू उद्ध्वस्त झाले तसेच भाविकांना भोजन देण्यासाठी बांधलेल्या सामुदायिक स्वयंपाकघरांचेही नुकसान झाले. अनेक जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलीस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक आणि आयटीबीपी लष्कराकडून अमरनाथ येथे बचावकार्य राबविले गेले. दुसरीकडे वातावरण खराब झाल्याने जम्मू मार्गाने होणारी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सर्व शासकीय अधिकाऱ्यांना फोनवर उपलब्ध राहण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अमरनाथ यात्रा तब्बल तीन वर्षांनंतर होत आहे. 2019 मध्ये केंद्राने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्यापूर्वी ही यात्रा मध्येच रद्द करण्यात आली. कोविड महासाथीमुळे 2020 आणि 2021 मध्ये ही तीर्थयात्रा झाली नव्हती. 30 जूनपासून या यात्रेला सुरुवात झाली असून 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सांगता होणार आहे. या वार्षिक यात्रेला 30 जूनपासून दोन मार्गाद्वारे सुरुवात झाली. दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमधील पहलगाम-नुनवानपासून 48 किलोमीटरचा पारंपरिक मार्ग आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बलताल या अन्य एका मार्गाने ही यात्रा सुरू होती. आतापर्यंत एक लाखाहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुंफेत जाऊन दर्शनाचा लाभ घेतला आहे. 29 जूनपासून जम्मूतील भगवतीनगर पायथ्याच्या यात्रा तळामधून एकूण 69 हजार 535 यात्रेकरू दहा तुकड्यांत रवाना झाले. सुरक्षेसाठी प्रशासनाने दोन लाख जवान तैनात केले आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने सांगितले की, ही दुर्घटना ढगफुटीमुळे झाली नसून, स्थानिक पातळीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे झाली. अमरनाथ गुहेजवळील पर्वतांच्या उंच शिखरांवर पावसामुळे अचानक पूर आला असावा. “क्लाउडबर्स्ट’ ही एका छोट्या भागात कमी कालावधीत अतिवृष्टीची घटना आहे. असा पाऊस जोरदार असतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अचानक 20 ते 30 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात एका तासात किंवा त्यापेक्षा कमी वेळात 100 मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो, तेव्हा त्याला क्लाउडबर्स्ट म्हणजे ढगफुटी म्हणतात. क्लाउडबर्स्ट कधी होईल हे आगाऊ सांगणे कठीण असते.
अमरनाथजवळील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. लष्कराने बचाव कार्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत त्याद्वारे ढिगाऱ्यांखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला गेला. दोन वॉल रडार आणि दोन स्निफर डॉग त्याठिकाणी नेण्यात आले. त्यांना शरीफाबाद येथून हेलिकॉप्टरने बचाव कार्यासाठी घटनास्थळी आणण्यात आले होते. पुराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या सैनिक आणि नागरिकांचा शोध घेण्यासाठी लष्कराने वॉल पेनिट्रेशन रडारचा वापर केला. दहशतवादविरोधी कारवाईत घर आणि भिंतींच्या मागे लपलेल्या दहशतवाद्यांचे ठिकाण शोधण्यासाठी लष्कराकडून या रडारचा वापर केला जातो. हे रडार भिंतीच्या मागे स्थिर आणि हलणारे लक्ष्य शोधू शकते. वॉल पेनिट्रेटिंग रडार उच्च रिझोल्यूशनसह उच्च वारंवारता रेडिओ लहरी सोडते. त्या लहरी वस्तूवर आदळतात आणि त्याची उपस्थिती जाणवते. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींवर आधारित आहे. ते भिंत ओलांडण्यास सक्षम आहे. आता हे तंत्रज्ञान तपासासाठी वापरले गेले.
अमरनाथ यात्रा भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. अत्यंत खडतर प्रवास करून, अनेकदा जीव धोक्यात घालून लाखो भाविक तेथे पोहोचतात. अनेकदा अपघात होतात. यापूर्वी अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ले देखील झालेले आहेत. काश्मीर खोऱ्यातील मूठभर पाकिस्तानवादी विघटनवाद्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा रोखण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा आणि यात्रेकरूंना निरनिराळे प्रयत्न करून निरुत्साहित करण्याचे प्रयत्न चालविले होते. पूर्वी चार महिने चालणारी ही यात्रा 55, 48, 45 त्यानंतर फक्त 35 दिवसांपर्यंत कमी करून टाकली होती.
प्रत्येक वर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान शे-दोनशे भाविकांचे अपघाती मृत्य होतात. कुणी वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे प्राण सोडतात. कुणी थंडीवाऱ्यात कुडकुडून मरतात. मात्र तरीही अमरनाथच्या यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या दरवर्षी वाढतच आहे.
या यात्रेच्या वेळी टाळता येण्याजोगे अपघात टाळून, यात्रेकरू मृत्युमुखी पडू नये व जखमी होऊ नये यासाठी अमरनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांसंबंधी पायाभूत सोयीत प्रचंड सुधारणा केली गेली आहे.
जगभरात कुठेही अमरनाथ यात्रेसारखी सर्वपंथसमभावाचा संदेश देणारी यात्रा असू शकत नाही. ही यात्रा पुन्हा आरंभ होण्याचे श्रेय एका मुस्लीम फकिराला दिले जाते. या यात्रेतील सर्व कुली आणि घोडेवाले मुस्लीम बांधव असतात. अमरनाथ यात्राकाळातच या सर्वांची वर्षभराची कमाई होऊन जाते. सरकारद्वारे निर्धारित केलेले दर कितीतरी कमी असतात, पण यात्रेकरू त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा श्रद्धेपोटी देऊन जातात. यात्रेकरूंकडून होणारा खर्च हाच अमरनाथ यात्रेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे.
इसवीसन पूर्व 32 च्या ग्रंथांमध्येही या यात्रेचा गौरवाने उल्लेख करण्यात आलेला आहे. अकराव्या शतकात 12 हजार 756 फूट उंचीवरील या गुहेतील शिवाच्या दर्शनासाठी गेलेल्या काश्मीरच्या महाराणी सूर्यमतीने तेथे त्रिशूळ अर्पण केले होते. आदी शंकराचार्य, भगवान स्वामीनारायण आदी महापुरुषांनी अतिशय अवघड अशी अमरनाथची यात्रा केली आहे. ही यात्रा भारताची एकता, प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.