शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या आतापर्यंतच्या सर्व फुटीमागे शरद पवार असल्याचं केलेलं विधान वस्तुस्थितीला धरून नसून केवळ अर्धसत्य आहे.
छगन भुजबळ, गणेश नाईक, राज ठाकरे, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांपैकी केवळ पहिले दोन नेते सेना सोडल्यानंतर पवारांच्याच आधाराने राजकारणात उभे राहिले; पण इतर तिघांच्या बाबतीत पवारांचा सुतराम संबंध नाही. 1990 साली शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले आणि बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना विरोधी पक्षनेते पद दिलं आणि तिथेच शिवसेनेच्या फुटीची सुरुवात झाली. आपण विधानसभेत 1985 पासून असताना आपली त्या सभागृहातील ज्येष्ठता डावलून मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेते पद मिळणं भुजबळांना रूचलं नव्हतं. त्यांना चुचकारण्यासाठी बाळासाहेबांनी मुंबईचं महापौरपद दुसऱ्यांदा दिलं. पण स्वत:च्या पक्षाहून जास्त विरोधी आमदारांवर नजर ठेवणारे तेव्हा मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्या चाणाक्ष नजरेतून भुजबळांची नाराजी सुटली नाही.
पवार एकाच वेळी दुहेरी राजकीय खेळी खेळत होते. जोशींशी त्यांची मैत्री सर्वश्रुत होती. त्या मैत्रीचा फायदा घेत पवार जोशींच्याद्वारे विलासराव देशमुखांच्या वर शरसंधान करून घ्यायचे, तर दुसरीकडे त्यांच्या आणि “नाराज’ भुजबळांच्या भेटी सुरू झाल्या होत्या. पण पक्षातील आपल्या विरोधकांना विरोधी पक्षाद्वारे नामोहरण करण्याचं राजकारण नेहमीच खेळलं जातं. पुढे सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते असलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या निशाण्यावर असायचे शरद पवार! अगदी आजही केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या निशाण्यावर असताना हेच विरोधक नितीन गडकरींच्या कामाची स्तुती करतात.
आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळे चिडलेल्या भुजबळांनी आपल्याबरोबर पक्षांतर करायला तयार असलेल्या 18 आमदारांची यादी तयार केली. यात मुख्यत्वे पहिल्यांदाच निवडून आलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील आमदारांचा समावेश होता. भुजबळांच्या पक्षांतराच्या सहा महिने आधीच पवार केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले होते. पण तरीही या पक्षांतरावर त्यांची बारीक नजर होतीच आणि याव्यतिरिक्त त्यांचे तेव्हाचे उजवे हात डॉ. पद्मसिंह पाटील सर्व हालचालींवर नजर ठेवून होते. भुजबळांच्या पक्षांतराचं श्रेय तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या नाईकांपेक्षा पवारांनाच दिलं पाहिजे.
पक्षांतर तेव्हाच घडतं जेव्हा एखाद्या पक्षातील नाराज गट आपली ताकद वाढवून दुसऱ्या पक्षांशी संधान बांधतो. भुजबळांच्या पाठोपाठ जनता दलाचे नऊ आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतत्वाखाली बाहेर पडले आणि कॉंग्रेसमध्ये सामील झाले होते. केवळ शिवसेनेचेच नव्हे, तर जनता दलातून कॉंग्रेसमध्ये आलेल्या नऊ जणांपैकी पाचपुते वगळता एकही आमदार 1995 च्या निवडणुकीत निवडून येऊ शकला नव्हता. कारण मुळात जनतेला पक्षांतर आवडत नाही. पक्षांतर कशाच्या बदल्यात घडलं आहे हे जनता ओळखून असते. भुजबळ 1995 साली बाळा नांदगावकर सारख्या नवख्या शिवसैनिकाकडून पराभूत झाले. पण तरीही ते राज्याच्या राजकारणात कायम एक शक्ती म्हणून राहिले आणि सहा वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले.
आधीच सेनेतून बहिष्कृत झालेल्या गणेश नाईकांना पवारांनीच दहा वर्षे आपल्या छत्राखाली आश्रय दिला होता. त्या काळात नाईकांची अक्षरश: चलती होती. स्वत: राज्यात कॅबिनेट मंत्री, मोठा मुलगा खासदार, धाकटा मुलगा आमदार तर नवी मुंबईचं महापौर पद पुतण्याकडे. अर्थात पवारांनी आपल्या छत्राखाली आलेल्या दोघांनाही वाऱ्यावर सोडलं नाही. भुजबळांच्या मुलाला आमदारकी तर पुतण्याला खासदारकीची टर्म मिळाली होती. एक प्रकारे या दोन्ही नेत्यांच्या पक्षांतराला पवारांनी नुसती साथ दिली असं नव्हे, तर या दोन्ही नेत्यांचा सांभाळही केला.
राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्यामागे किंवा त्यासाठी त्यांना रसद पुरवण्यामागे पवार नव्हते. मुळात या दोघांनीही शिवसेना सोडण्यामागे खरं कारण त्यांचे उद्धव ठाकरेंशी असलेले विळ्या भोपळ्याचे संबंध! ही गोष्ट जरी खरी असली की, नारायण राणे हे पक्ष सोडल्यानंतर पवारांनाही भेटले होते, तरीही माजी मुख्यमंत्र्याला सामाविण्यासाठी आवश्यक असलेली जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे नसावी. त्याचवेळी सोनिया गांधींचे तत्कालीन राजकीय सचिव अहमद पटेल यांच्या कथित मध्यस्थीने दोन राज्यांचे विरोधी पक्षातील दोन मोठे नेते कॉंग्रेसमध्ये सामिल झाले होते. त्या दोघांनाही अहमद पटेलांकडून मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं गेलं होतं. पण ते आश्वासन केवळ सिद्धरामय्या यांच्याच बाबतीत कर्नाटकात पूर्ण केलं गेलं. मात्र राणेंच्या बाबतीत नाही. भलेही राणेंना कॅबिनेट मंत्री पद, एका मुलाला खासदारकी,दुसऱ्याला आमदारकी मिळाली तरीही मुख्यमंत्री पद मात्र मिळालं नाही. ही सल राणेंच्या मनात राहिली. भाजपचा डोळा राणेंवर होताच, मुख्यत्वे उद्धव ठाकरेंशी लढायला. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी राणेंना राज्यसभेवर पाठवलं आणि पुढे केंद्रीय मंत्री पदही दिलं. पण 2005 साली शिवसेना सोडण्यापासून 2019 मध्ये भाजपमध्ये सामिल होईपर्यंत शरद पवारांचा कुठेही “रोल’ दिसत नाही.
त्याच प्रकारे राज ठाकरे यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हाही त्यात पवारांचा कुठलाही सहभाग नव्हता. उलट राज ठाकरेंनी जेव्हा पवारांची मुलाखत घेताना प्रश्न विचारला होता, “राज की उद्धव’, तेव्हा “ठाकरे बंधू’ असं उत्तर देत पवारांनी कोणाचीही बाजू घेणं टाळलं होतं. एकूण राज यांच्या पक्षांतराशी पवारांचा तसा संबंध दिसत नाही. याउलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री केवळ पवारांच्या आशीर्वादामुळे होऊ शकले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पक्षांतराचा बचाव करत असताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं आधीच्या शिवसेनेतील फुटीमागे पवार होते, हे विधान अर्धसत्य आहे, असं वाटतं.