नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मौर्य यांनी एका कार्यक्रमात मागील सरकारवर निशाणा साधत योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांच्या तावडीतून व्यापाऱ्यांना मुक्त केले असल्याचे म्हटले आहे.
‘मथुरा तयार आहे’ या ट्विटने वादाला तोंड फुटल्यानंतर लगेचच केशव प्रसाद मौर्य यांनी हे खळबळजनक विधान केले आहे. भाजपाची सत्ता येण्यापूर्वी लुंगीवाले गुंड राज्यात मुक्तपणे फिरत होते आणि जाळीदार टोपी घातलेले लोक व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे, असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी, “२०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीचाप गुंड फिरत होते. डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्यांना धमकावण्याकरिता वापरत असत. जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमके द्यायचे.” असे म्हटले आहे.
“मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. अन्यथा, सपा आणि बसपाच्या राजवटीत टोप्या आणि लुंगी घातलेले गुंड व्यापाऱ्यांना धमकावायचे आणि खंडणी वसूल करायचे. आज हे सर्व नाहीसे झाले आहे, कारण भाजपाने टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत संपवली आहे. व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने २०१४ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत,” असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ च्या निवडणुकीसाठी सपा, बसपा आणि भाजपा जोरदार प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपा पूर्ण आत्मविश्वासात आहे. यावेळी निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकून २०२२ मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल असा भाजपाचा दावा आहे. भाजपाने प्रयागराजमध्ये मंडलस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, फतेहपूर येथील व्यापारी सहभागी झाले होते.