अवकाळीमुळे वालचंदनगरला नुकसान ः द्राक्ष, डाळिंब बागाही आडव्या
वालचंदनगर – इंदापूर तालुक्यामध्ये शनिवारी (दि. 1) झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये ज्वारी, गहू , हरभरा, मका, द्राक्ष व डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याची इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
या भागातील डाळिंब, द्राक्ष फळबागांचे नुकसान झाले आहे. डाळिंबबागा ज्या शेतकऱ्यांनी फळभार धरला होता, त्या बागेची फुलं, फळं या अवकाळी पावसामुळे गळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ नुकसान झालं आहे. गहू , हरभरा, ज्वारी, काही लोकांची ज्वारी काढणे चालू आहे. काही शेतकऱ्यांची पीके काढणीला आली आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट आले आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील सर्व भागात जोरदार पाऊस झाला. हातातोंडाशी आलेला घास पूर्ण मातीमोल होतो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. येणाऱ्या काळामध्ये थोडेफार गहू, हरभरा, ज्वारी यातून शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे.
हाता तोंडाशी आलेला घास हिरावला
इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, मका तसेच डाळिंब द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता – तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे आस्मानी संकटाची दखल सरकारने घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.