नेवासे -सध्या लॉकडाऊनचे नियम काहीप्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. काही व्यवसायांनाही सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कुकाण्यातील दुकाने उघडण्यात आली आहेत. सध्या व्यावसायिकांसह ग्रामस्थ देखील सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत असल्याने जागोजागी गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे कुकाणेकरांना कुणतीरी आवरा हो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मागील दीड महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद होत्या. त्यामुळे पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग ग्रामस्थांना घरातच बसा, असे आवाहन करत होता. कुकाणा परिसरातील 36 खेडी व परिसरातील गावांसाठी मोठी बाजार पेठ आहे. कुकाण्यात राष्ट्रीयीकृत, सहकारी बॅंका, पतसंस्था, कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य दुकाने, किराणा, मिठाई, कापड दुकाने मोठ्याप्रमाणात आहेत. लॉकडाऊनमुळे ही सर्व दुकाने बंद होती. मात्र शासनाने लॉकडाऊनचे नियम काही अंशी शिथिल केल्याने काही दुकानांना उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दुकाने उघडण्यात आली आहे. त्यामुळे काही जण विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.
काही दुकानदारही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याने त्यांच्या दुकानांसोमोर ग्राहकांची गर्दी होत आहे. काही राजकीय पदाधिकाऱ्यांचीच बाजारपेठेत दुकाने असल्याने ते आपला व्यवसाय सांभाळण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांची काळजी कोण घेईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत करोनाचा शिरकाव न झालेल्या कुकाण्यात त्याला शिरकाव करून देण्याची संधीच एकप्रकारे ग्रामस्थ देत असल्याचे या गर्दीवरून दिसत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. मात्र त्याकडेही ग्रामस्थ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुकाणेकरांना कुणीतरी आवरा हो, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.