औरंगाबाद – किरीट सोमय्या हे केवळ डायलॉगबाजी करत असून ते शक्ती कपूर असल्याची टीका औरंगाबाद शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. काल रात्री भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला असुन, सोमय्या यांना या हल्ल्यात थोडी दुखापत देखील झाली असल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर खैरे यांनी सोमय्या हे शक्ती कपूर असल्याचे म्हटले आहे.
काल दिवसभर झालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यानंतर या दोघांना भेटण्यासाठी किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात येत असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला. तसचं शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या.
सदर घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षाने म्हणजेच भाजपच्या नेत्यांनी महाविकासआघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसेच खैरे यांनी यावेळी विकास कामांच्या श्रेयावरून अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली आहे. भागवत कराड हे अजून नवीन आहेत, त्यांना काय कळतं? अशी टीका खैरे यांनी केली आहे. तर, पुढे बोलताना खैरे म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला तर त्यांना दहा ठिकाणी फिरायची गरज काय? असा सवाल उपस्थित करत सोमय्या यांना स्टंटबाजी करायची सवय असल्याची टीका खैरे यांनी केली.