श्रीनगर – पुलवामाच्या पहू भागात रविवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या कारवाईत ठार झालेले दहशतवादी “लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अद्यापही या भागात चकमक सुरू आहे.
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पहू भागात दहशतवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम राबविण्यात आली होती. या दरम्यान दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांकडूनही चोख उत्तर देत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या भागात आणखी दहशतवादी दडून बसले असण्याची शक्यता असल्याने, जवानांनी परिसरास चारही बाजूंनी वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू आहे.