कोल्हापूर(प्रतिनिधी): वीज बिलाच्या बाबतीत सामान्य सामान्य ग्राहकांबरोबर उद्योगधंद्यांच्या समस्या सोडवा, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि महावितरण अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत इतरांनी जसे विविध मुद्दे मांडले त्याचबरोबर आमदार जाधव यांनी खालील मुद्दे मांडून त्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली.
ते म्हणाले, सध्या जी बिले आलेत, ती मोठया प्रमाणात वाढून आली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. नागरिकांना योग्य माहिती देऊन, त्यांच्या शंकानिरसन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक महिन्याचे स्वतंत्र बिल देण्याची व्यवस्था करावी.
कोरोनामुळे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. सध्या केवळ दहा ते वीस टक्के उद्योग सुरू आहेत. त्यासाठी बिलात पूर्णतः स्थिर आकार घेणे म्हणजे एक प्रकारे उद्योगांना चढ्या दराने वीज देण्याचा प्रकार आहे. यामुळे वीज बिलातील स्थिर आकार माफ करावेत.
१ एप्रिल २०२० पासून राज्यातील सर्व उच्च दाब ग्राहकांवर केव्हीएएच (KVAH) आधारे बिलिंग आकारणी सुरू केलेली आहे. जुनी केडब्ल्यूएच (KWH) युनिट्स व नवीन केव्हीएएच (KVAH) युनिट्स यामध्ये किमान सव्वा-दीडपट ते कमाल २० पट इतक्या जादा युनिट्सची आकारणी ग्राहकांवर झालेली आहे. केव्हीएएच (KVAH) साठी उद्योजकांना मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे केव्हीएएच (KVAH) ऐवजी केडब्ल्यूएच (KWH) या पद्धतीने वीज बिलाची आकारणी करावी.
राज्यातील बहुतांश उच्च दाब ग्राहकांनी पॉवर फॅक्टर व केव्हीएएच (KVAH) नियंत्रणासाठी APFC (Automatic Power Factor Correction) सिस्टम लावलेली आहे. तथापि झीरो-लोडच्या परिस्थितीमुळे केव्हीएएच युनिट्स २ ते ५ पट झालेली आहेत. या सर्व ग्राहकांना पुन्हा यामध्ये सुधारणा किंवा बदल करावा लागणार आहे; मात्र ही बाब खर्चिक आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत असलेला उद्योग आर्थिक संकटात जाणार आहे. यामुळे केव्हीएएच पद्धतीची आकारणी एक वर्षासाठी रद्द करून पूर्वीप्रमाणे केडब्ल्यूएच पद्धतीनुसार आकारणी केल्यास ग्राहकांना दिलासा मिळेल.