सोलापूर – राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत पंढरपुरात राज्यस्तरीय कृषी मेळावा आयोजीत केला होता. या कार्यक्रमात खते बी बियाणे दुकानदारांनी तुफान गोंधळ केला आहे. बोगस बी बियाणे संदर्भात दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या कायद्या विरोधात दुकानदार आक्रमक झाले होते.
पंढरपूरमध्ये राज्यस्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राज्यभरातून 25 हजारापेक्षा जास्त खते बियाणे दुकानदार पंढरपूरमध्ये आले. बोगस बियांमुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येऊ लागल्याने राज्य सरकारने याच्या विरोधात कायदे बनवायला सुरुवात केली आहे.
त्यातील काही जाचक अटींमुळे बोगस खते आणि बियाणांबाबत कंपन्या किंवा ते तपासणारे अधिकारी यांच्यावर कारवाई न करता थेट दुकानदारांवर झोपडपट्टी कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याने आजच्या राज्यस्तरीय मेळाव्यात हजारो दुकानदारांनी आपला संताप कृषिमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी करत व्यक्त केला.
आम्हाला मिळणारी खते अथवा बियाणे हे कंपन्या बनवतात. ते योग्य का अयोग्य याची तपासणी राज्याचे कृषी अधिकारी करतात. यानंतर पॅकिंग केलेले साहित्य राज्यभर विक्रीसाठी दुकानात येत असताना बोगस बियाणे अथवा खते आढळल्यास कारवाई आमच्यावर का? असा सवाल हे हजारो दुकानदारांनी केला.
या कायद्याबाबत कृषिमंत्र्यांच्या बोलण्याने विक्रेत्यांचे समाधान झाले नसल्याने या विक्रेत्यांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. कृषी मंत्र्यांना वारंवार या बाहेरच्या घोषणाबाजीमुळे भाषणात अडथळे येत होते त्यामुळे अखेर कृषी मंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेत मागच्या बाजूने निघून जाणे पसंत केले.