हांगझोऊ :- तिलक वर्मा व कर्णधार ऋतूराज गायकवाड यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर भारतीय पुरुष क्रिकेट संघाने येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत पदकही निश्चित केले आहे.
भारतीय संघाला या स्पर्धेत सर्वोत्तम रेटिंग असल्याने थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला होता. त्या सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला व उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. शुक्रवारी झालेल्या लढतीत भारताच्या साई किशोरसह सर्वच गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली व बांगलादेशचा डाव 9 बाद 96 धावांवर रोखला. बांगलादेशकडून झकर अलीने नाबाद 24 तर, परवेझ हुसेनने 23 धावांची खेळी केली. भारताच्या साई किशोरने सर्वाधिक 3 गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी मिळवले. अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिष्णोई व शाहबाज अहमद यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. नेपाळविरुद्ध शतकी खेळी करणारा यशस्वी जयस्वाल साफ अपयशी ठरला. त्यानंतर मात्र, कर्णधार ऋतूराज गायकवाड व तिलक वर्मा यांनी जबाबदारीने फलंदाजी केली. तिलकने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने गायकवाडसह संघाचे अर्धशतकही थाटात पूर्ण केले. यावेळी ऋतूराज जास्त आक्रमक फलंदाजी करत होता. या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजीची लक्तरे वेशीला टांगली. तिलकने नाबाद 55 धावांच्या खेळीत अवघ्या 26 चेंडूत 2 चौकार व तब्बल 6 षटकार फटकावले. ऋतूराज 40 धावांवर नाबाद राहीला. त्याने या खेळीत 26 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार फटकावले. बांगलादेशच्या रिपोन मोंडलने जयस्वालला बाद करत एकमेव बळी मिळवला.
A formidable 9️⃣-wicket win over Bangladesh and #TeamIndia are through to the #AsianGames Final! 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/75NYqhTEac#IndiaAtAG22 pic.twitter.com/SsRVenSNmu
— BCCI (@BCCI) October 6, 2023
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश – 20 षटकांत 9 बाद 96 धावा. (झकर अली 24, परवेझ हुसेन 23, साई किशोर 3-12, वॉशिंग्टन सुंदर 2-15). भारत – 9.2 षटकांत 1 बाद 97 धावा. (तिलक वर्मा नाबाद 55, ऋतूराज गायकवाड नाबाद 40, रिपोन मोंडल 1-26).
अफगाणिस्तानशी अंतिम लढत
शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला व स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या फेरीत आता उद्या (शनिवार) त्यांचा सामना भारतीय संघाशी होणार आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानला केवळ 115 धावाच करता आल्या. ओमर युसुफने सर्वाधिक 24 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने सर्वाधिक 3 बळी घेतले. अफगाणिस्तानने 17.5 षटकांत 6 गडी गमावून 116 धावा करत विजयासह अंतिम फेरी गाठली. त्यांच्याकडून नुर अली झद्रानने 29 तर, गुलबदन नईबने नाबाद 26 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून अराफत मिन्हास व उस्मान कादीर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.