नवी दिल्ली : काय करावे आणि काय करू नये याचे समाजाने काटेकोर पालन केल्यास जून आणि जुलै महिन्यात करोना “पिक’ गाठण्याची भीती राहणार नाही, असे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले आहे. येत्या काही महिन्यात करोना शिखर पातळी गाठेल, असा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला होता.
दैनिक वार्तालापात आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, जून जुलैमध्ये आपण करोना बाधितांची सर्वोच्च पातळी गाठू, असे काही नाही. जर मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले आणि समाजाचे सहकार्य मिळाले तर आपण त्या पातळीपर्यंत पोहोचणार नाही. या सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याचा अंदाज हा विविध गृहितकांवर अवलंबून असतो. त्यामुळे, हा अंदाज प्रत्येक दोन संस्था वेगवेगळा सांगत असतात.
37 हजार 916 करोनामुळे झालेल रुग्णांपैकी तीन टक्के जणांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. तर पाच टक्के आयसीयुमध्ये आहेत. 1.1 टक्के जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
देशात तीन हजार 390 जण गेल्या 24 तासांत बाधित झाले. तर 1273 जण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 16 हजार 540 वर पोहोचली आहे. तर बरे होण्याचा दर 29. 63 टक्के झाला आहे, म्हणजे दर तीन बाधितांपैकी एक जण बरा होत आहे.