नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीसाठीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलैमध्ये होणार आहेत. त्या परीक्षा 1 ते 15 जुलै या कालावधीत घेण्याची घोषणा शुक्रवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी केली.
करोना फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सीबीएसईबरोबरच इतर परीक्षाही रखडल्या. आता निशंक यांनी केलेल्या घोषणेमुळे सीबीएसईच्या परीक्षांबाबतचा संभ्रम दूर होणार आहे. करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रही प्रभावित झाले आहे.
सीबीएसईच्या रखडलेल्या परीक्षा होणार की नाही आणि झाल्या तर केव्हा याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू होते.