नाशिक : देशात मागील काही दिवसांपासून अदानी समूहाच्या विरोधात आलेल्या अहवालाने एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीका केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाष्य केले होते. मात्र संसदेत भाषण करताना खासगी कंपन्यांविषयी विरोधकांनी उपस्थित केलेल्या महत्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी कुठलेही भाष्य केले नाही. जवळपास ८० मिनिटांच्या भाषणात त्यांनी कष्टकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक शब्ददेखील काढला नाही. उलट जे कुणी विरोध करतील, त्यांच्याशी आपण एकटे लढायला तयार असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांच्या याच भाषणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे.
“देशाची सत्ता, सेना, पोलीस दल हे पाठिशी असल्याने कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडाल तर त्यांच्याशी संघर्ष करायला तयार असल्याचे सांगणारे लढवय्ये देशाला नको आहेत, अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. कष्टकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारे, त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्यांची देशाला गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वीज उद्योगातील आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार महासंघ संघटनेच्या त्रैवार्षिक तीन दिवसीय अधिवेशनास नाशिकमध्ये सुरुवात झाली. या अधिवेशनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी संसदेतील अदानी समुहाबाबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत पंतप्रधानांना कामगार, कष्टकरी यांच्या हिताच्या दृष्टीने काही धोरणे स्वीकारली पाहिजे, असे म्हटले आहे.
तर दुसरीकडे माजीमंत्री छगन भुजबळ यांनी खासगीकरणाच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधत ते कदापि होऊ न देण्याची भूमिका मांडली. वीज कंपन्यांचे खासगीकरण झाल्यास केवळ कर्मचारी नव्हे तर, सर्व घटकांचे नुकसान होणार आहे. संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता वेगळय़ाच विषयावर चर्चा केली जात असल्याचे सांगत भुजबळ यांनी भाजपला लक्ष्य केले.