खडकवासला – उन्हाळा चालू झाला आहे. हा काळ नागांचा मिलन काळ असतो. यावेळी मादी विशिष्ट प्रकारचं द्रव सोडत जाते. त्याच्या वासाने नर मादीच्या मागे येत असतात. १ किवा अनेक नर मादीच्या मागे येऊ शकतात. खडकवासला येथे कुणाल वाल्हेकर यांच्या शेतामध्ये नाग असल्यामुळे मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी कुणाल वाल्हेकर यांनी सर्पमित्र सागर बावळे यांना फोन करून बोलावले.
बावळे यांनी नाग सुरक्षितरित्या पकडून तेथील लोकांना त्याबाबत शास्त्रशुद्ध माहिती दिली. यावेळी एकावेळी तीन नाग सापडले. सागर बावळे यांना साप पकडण्यासाठी मनोज शिंदे, आकाश झोंबडे व सागर दीक्षित या सर्पमित्रांनी सहकार्य केले.
“उंदीर हे सापाचे नैसर्गिक खाद्य आहे. भारतामध्ये सरकारी अन्नधान्य साठ्याच्या ३० टक्के साठा हा उंदीर खाऊन फस्त करतात. एक उंदीर त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये सरासरी ९०० पिल्लांना जन्म देतो. साप नैसर्गिक शत्रू असल्यामुळे उंदरांच्या प्रजननावर नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण ठेवतो. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी सापाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. सर्व सामान्य लोकांनी पर्यावरणात सापाचे महत्त्व ओळखून त्यांना वाचवणे खूप गरजेचे आहे.”
– सागर बावळे, सर्पमित्र