मुंबई – दापोली येथे असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे (शिंदे गट) रामदास कदम यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल परब यांचेदेखील नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण त्याआधीच परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून ईडीला महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने परब यांना दिलासा देत येत्या सोमवारपर्यंत (20 मार्च) या प्रकरणी त्यांना अटक करू नये, असे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुढील काही दिवसांसाठी का असेना पण परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या प्रकरणात काही तासांपूर्वी जयराम देशपांडे यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात अनिल परब यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केलेल्या आहेत. ज्यामुळे परब यांची चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे. परब यांनी दापोलीत असलेल्या या साई रिसॉर्टचे बांधकाम हे बेकायदेशीररीत्या केले असल्याचा आरोप सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे परब यांना सुद्धा अटक करण्यात येईल, अशी भविष्यवाणी सुद्धा सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेली आहे.
काय आहे प्रकरण?
दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परबांवर शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले. जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी 2019 मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना 1.10 कोटींना विकण्यात आली.
जुन्या पेंशन योजनेबद्दल सरकारची भूमिका काय याचा खुलासा करावा – अजित पवार
दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मते रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.