Smriti Irani Vs Rahul Gandhi । कॉंग्रेस नेते राहुल गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या अमेठीतून पराभूत झाले होते. त्यानंतर ते केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेत गेले होते. इंडिया आघाडीत डाव्या पक्षांची कॉंग्रेसशी युती झाली आहे.
तथापि, या आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याने वायनाडमधून आपल्याच पत्नीला लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे राहुल गांधी वायनाडमधून लढणार की अमेठीतून अशी चर्चा बऱ्याच काळापासून रंगली असून आता राहुल अमेठीतूनच लढणार असल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने स्पष्ट केले आहे.
राजधानी नवी दिल्लीत यासंदर्भात झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अमेठी येथील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल म्हणाले की अमेठीत राहुल गांधी हेच कॉंग्रेसचे उमेदवार असणार आहेत व त्याची घोषणा लवकरच केली जाईल. पक्षाने याची तयारी सुरू केली असून प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडणार आहे.
उत्तर प्रदेशात कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीची आघाडी झाली असून कॉंग्रेस अमेठी आणि रायबरेलीसह उत्तर प्रदेशातील १७ जागा लढवणार आहे. तर समाजवादी पक्षाला ६२ तर त्यांच्या मित्रपक्षाला एक जागा सोडण्यात आली आहे.
राहुल यांचे अमेठीतून लढणे निश्चित झाल्यानंतर त्यांची भाजपच्या स्मृती इराणी यांच्याशी तिसऱ्यांदा लढत होईल. मागच्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. दरम्यान, सोनिया गांधी यांनी रायबरेलीची जागा सोडल्यानंतर आता येथून प्रियंका गांधी रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ते अद्याप निश्चित झालेले नाही.
स्मृती इराणी यांचे आव्हान – । Smriti Irani Vs Rahul Gandhi
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले होते आणि एनडीए आणि यूपीए या दोघांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीवर चर्चा करण्यास सांगितले होते.
स्मृती इराणी यांनी त्यांना आव्हान दिले होते की, राहुल गांधी, तुम्ही मैदान निवडा, आम्ही कार्यकर्त्यांची निवड करू. त्यांच्यासमोर युवा मोर्चाचा कोणताही कार्यकर्ता बोलू लागला तर ते बोलायला विसरतात, असेही स्मृती म्हणाल्या होत्या.
अमेठीतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात – । Smriti Irani Vs Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी २००४ साली अमेठीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळी ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला होता. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेतून देशभरात लोकांना भेटत आहेत.
याचाच भाग म्हणून ते अमेठीला देखील गेले होते. या वेळी राहुल या जागेवरून निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात होते. राहुल यांचे दिवंगत काका संजय गांधी, दिवंगत वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी हे देखील अमेठीमधून खासदार राहिले आहेत.