येरवडा –जयजवान नगर येथे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यालगत राडारोडा टाकला जात आहे. प्रभागातील कचरा विलगीकरणाचे काम येथे केले जाते. मात्र, ड्रेनेज-चेंबर्स स्वच्छतेनंतर त्यातून निघालेला गाळ रस्त्यावर टाकला जातो. तो सुकल्यानंतर येथून उचलला जातो. मात्र बरेच दिवस झाले तरी अद्याप हा राडारोडा उचलला गेलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
पालिकेचेच कर्मचारी येथे राडारोडा टाकत असल्याने जवळपासचे नागरिकही येथे सर्रास राडारोडा टाकत आहेत. माजी नगरसेवकांनी येथे त्यांच्या संकल्पनेतून सुशोभिकरण केले होते. मात्र, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर गाळ टाकून ती संकल्पनाच मोडीत काढली आहे. आता पुन्हा या सुशोभिकरण करण्यासाठी निधी खर्च करायचा का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित आरोग्य निरीक्षक आणि मुकादमावर कारवाई करावी. त्यांच्याकडून नुकसानीची भरपाई घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
…निविदांसाठी अट्टहास
ड्रेनेज-चेंबर्समधून गाळ काढायचा आणि रस्त्यावर टाकायचा. तो उचलण्यासाठी पुन्हा निविदा काढायची असे प्रकार क्षेत्रीय कार्यालयात सुरू आहेत. यातून लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. राडारोडा पडलाच नाही, तर तो उचलण्यासाठी निविदा कशी निघणार? असा विचार येथील काही नेते करत आहेत, असा आरोप होत आहे.
येथील फीडर पॉइंट दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे. मात्र, जागेअभावी ते शक्य होत नाही. तसेच येथील राडारोडा लवकरात लवकर उचलण्यात येईल. – अनिल डमाळे, आरोग्य निरीक्षक, येरवडा क्षेत्रीय कार्यालय