पुणे- अंगणवाडी सेविकांच्या मानधनासह इतर मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिल्याने फेब्रुवारी महिन्यातील मोर्चा आम्ही स्थगीत केला. परंतु, राज्य सरकारने अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबत काहीच निर्णय घेतला नाही. महागाई एवढी वाढली असताना आम्हाला चार वर्षांपासून मानधन वाढ नसल्याचे सांगत अंगणवाडी सेविकांनी बुधवारी (दि.16) जिल्हा परिषदेवर संताप मोर्चा काढला.
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रच्या राज्य सचिव शुभा शमीन म्हणाल्या, गॅस किती महाग झाला आहे, सर्वच स्तरावर महागाई वाढली आहे. सरकारने मानधनवाढीबाबत आश्वासन दिले होते मात्र ते पाळले नाही. करोनाकाळात अंगणवाडी सेविकांनी पुढे येऊन काम केले. त्यांच्या मानधन वाढीचा विचार सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला पाहिजे. यापूर्वी दिलेल्या मोबाइलमध्ये केंद्राने पोषण ट्रॅक ऍपची भाषा इंग्रजी केली. ते मराठी असणे आवश्यक होते. इंग्रजीत असल्याने महिलांना त्यामध्ये माहिती भरताना अडचणी येत आहेत. यावेळी पुणे जिल्हा सचिव रजनी पिसाळ, बकुळा शेंडे, अशाबी शेख, सुवर्णा शितोळे, रेखा शितोळे, अनिता कुटे, जयश्री मारणे उपस्थित होते.