वानवडी – येथील सेंट पॅट्रिक चर्च ते बी. टी. कवडे रस्त्यापर्यंतच्या टप्प्यात कालव्याची दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्ती आणि स्वच्छतेकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे.
ग्रामीण भागासाठी या कालव्यातून पाणी पुढे जाते. मागील काही दिवसांपासून कालव्यातून पाणी सोडणे थांबवले आहे. या पाण्यात थर्माकोलचे तुकडे, प्लॅस्टिक कचरा, कापड, इतर कचऱ्यामुळे कालव्याचे डंपिंग ग्राऊंड झाले आहे. लहान मुले, युवक कालव्याच्या पाण्यात पोहत असतात त्यामुळे पाण्यातील घाणीमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. काही ठिकाणी कालव्याच्या तटाचा भाग हा कालव्यात कोसळला आहे. तर भिंती फुटलेल्या आहेत. सुरक्षाभिंत किंवा जाळ्या बसवण्यासाठी आश्वासनाला मुहूर्त मिळत नसल्याने येथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. रस्त्यावरील काही भागात पथदिवे नाहीत.
कालवा सुधारणा प्रकल्प हाती घ्यावा
पुणे महापालिका तसेच पाटबंधारे विभागाकडून कालवा स्वच्छतेकडे व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. कालवा स्वच्छ करुन सुरक्षिततेसाठी बाजूने जाळ्या बसवण्यात याव्यात. तसेच नदी सुधार प्रकल्पाबरोबरच कालवा सुधारण्याचा प्रकल्पही हाती घेण्यात यावा, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.