पाबळ – राजगुरूनगर तालुक्यातील सेझ प्रकल्प परिसरात नुकतीच एका ठेकेदाराची हत्या झाली. मूळचे पाबळ येथील व कनेरसर येथे स्थायिक झालेले नवनाथ झोडगे या हत्येच्या प्रकरणात बळी गेले आहेत. हत्येतील आरोपी पोलिसांनी जेरबंदही केले आहेत. मात्र या घटनेतूनच अनेक गंभीर बाबी पुढे येत आहेत. त्या बाबींचा मोठा परिणाम भविष्यात पुढे येण्याची भीती शोकसभेत व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या खुनामागे तरुणाईचा रोजगार, औद्योगिक क्षेत्राचा विकास, स्थानिक वाद, तरुणाईचा भाईगिरीतील वाढता सहभाग, कायद्यातील पळवाटा आणि सामाजिक अशांतता या बाबी अंतर्भूत झाल्या आहेत.
ग्रामीण भागातील विकास प्रक्रियेसाठी औद्योगिक वसाहत मोठा हातभार देत असते. यातून मोठ्या भागातील रोजगारासाठी मोठी संधी उपलब्ध होत असते, या संकल्पनेलाच तडा जाण्याची भीती नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणातील आरोपी पकडले गेले तरी त्यांच्याकडून झालेल्या निर्घृण हत्येतून हा प्रकार उद्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे मोठा निर्देश करीत आहे. हीच बाब तरुणाईसाठी धोक्याची घंटा आहे. तर वर्चस्वाच्या लढाईत तरुणांचा वाढता सहभाग भावी पिढीची चिंता वाढवणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुळात पूर्ण उभी सुद्धा राहू न शकलेली ही वसाहत आठ ते दहा कंपन्यांच्या माध्यमातून विकसित होत आहे. या वसाहतीत येऊ पाहणाऱ्या कंपन्यांच्या मानसिकतेवर ही घटना प्रहार करणारी आहे. त्यामुळे ही घटना विकास प्रक्रियेलाच खीळ घालणारी व या भागातील हजारो तरुणांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेणारी ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. औद्योगिक वसाहतीत अनेक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घरातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
तर त्याच अर्थार्जनातून कुटुंबाला हातभार लागत असताना ही घटना पालकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. यासाठी घटनेचा तपास जितका महत्त्वाचा आहे. तितकाच भविष्यात या घटनांवर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाचा आहे. ठेकेदारीवरून या वादाची ठिणगी पडली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र एखाद्या मोठ्या औद्योगिक वसाहतीची श्रीमंती या फुलू पाहणाऱ्या वसाहतीत घडली आहे. त्यामागची कारणे भविष्यात उजेडात येणे गरजेचे आहेत.
उद्याच्या वर्चस्व वादासाठीही ही घटना असू शकते. त्यात तथ्य असेल तर ही घटना उद्याची “त्सुनामी’ ठरल्याशिवाय राहणार नाही. खून प्रकरणातील सूत्रधार उजेडात यावेत, अशी मागणी आहे. त्यामागे त्या तरुणांच्या हातातील हत्यारे, त्यांनी केलेले क्रौर्य, त्यातून सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या कृतीपेक्षा भयंकर असल्याची चर्चा होत आहे. ज्या वयात काही तरी करून दाखवण्याची उर्मी असते. त्या उर्मीलाच विघातक वळण देणारी प्रवृत्ती असू शकते, हा कयास आहे. त्यामागे सूत्रधार असावा, या शक्यतेला बळ देणारी ठरत आहे.