तळमजला घाणीच्या विळख्यात; शहरात अतिक्रमणांची समस्या गंभीर
म्हसवड – आ. जयकुमार गोरे यांच्या गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत म्हसवड पालिकेने बांधलेल्या भाजी मंडईच्या वापराविना पडून असलेल्या अद्ययावत इमारतीच्या तळमजल्यावर घाणीचे साम्राज्य आहे. याच इमारतीत “रात्रीस खेळ चाले’ अन् दिवसा “डासांचा थवा हाले’ असे प्रकार होत आहेत. शहरात अतिक्रमणांसह इतरही अनेक समस्या आहेत; परंतु पालिकेला सध्या कोणीही वाली नसल्याने नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे साफ दुर्लक्ष आहे.
मुख्याधिकारी महिन्यातून एकदाच पालिकेत येत आहेत तर जनतेने थेट निवडून दिलेले नगराध्यक्षही मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजरीचे कारण सांगून जबाबदारी झटकत आहेत. जनतेने नगराध्यक्षांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले आहे. मात्र, या अपेक्षांची पूर्तता होत नसल्याने नगराध्यक्ष व नगरसेवकांना निवडून देऊन आपणच आपल्या पायांवर धोंडा नव्हे तर अख्खी शिळ मारून घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
म्हसवड पालिकेत परिवर्तन आघाडीची सत्ता येऊन तीन वर्षे झाली मात्र तरी शहरात विकासाचे एकही ठोस काम झालेले नाही. गेल्या पंचवार्षिकमध्ये आ. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमी, गार्डन, व्यापारी संकुल, अशी शहराच्या सौंदर्यात भर घालणारी कामे झाली. मात्र, सध्याच्या परिवर्तन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना या कामांची निगाही राखता आली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कारण स्मशानभूमी सोडली तर पालिका कार्यालयाशेजारी बांधण्यात आलेली भाजी मंडईची इमारत गेल्या अडीच वर्षांपासून घाणीच्या विळख्यात आहे. या इमारतीच्या तळघरात सध्या डुकरांचा वावर आहे. या इमारतीत “रात्रीस खेळ सुरू’ असल्याचे नागरिक सांगत आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावर व परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने शहरातील नागरिक गेले तीन महिने चिकुनगुनिया, डेंग्यू, अशा साथीच्या आजाराने ग्रासले आहेत.
शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरात डासांच्या निर्मूलनासाठी फवारणी करण्याची मागणी नगराध्यक्षांकडे केली असता, मुख्याधिकारी नसल्याचे कारण सांगून तेच जबाबदारी झटकत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून त्याकडे पालिका प्रशासन हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. पालिकेच्या इमारतीसमोरून रथमार्गाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. याच रस्त्यावर स्टेट बॅंक शाखेच्या मागे असलेल्या जिल्हा परिषदेची शाळा आहे.
या शाळेच्या मागील बाजूस असलेल्या ब्राह्मण गल्लीतून येणारे गटार शाळेजवळ बंद झाले आहे. त्यातून वाहणाऱ्या सांडपाण्याला पुढे मार्गच नसल्याने गटारातील सांडपाणी शाळेसमोरच्या रस्त्यावर वाहत आहे. याच परिसरात भेळ, वडापावच्या गाड्यांची अतिक्रमणे झाली आहेत. या ठिकाणी हॉटेलही आहे. या हॉटेलचे सांडपाणीही शाळेसमोरच्या रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. या शाळेतील विद्यार्थी साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत.
नगराध्यक्षांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
आ. गोरे यांच्या प्रयत्नाने माणगंगेच्या किनारी बांधण्यात आलेल्या बगीचाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी पालिका हद्दीत बहुसंखेने असलेल्या धनगर समाजाने वेळोवेळी केली आहे. मात्र, याच समाजाच्या असलेल्या नगराध्यक्षांना गेल्या तीन वर्षात हा प्रश्न मार्गी लावता आला नाही, ते शहरात विकासकामे कशी करणार, अशी चर्चा धनगर समाज आहे.