सुभाष कदम
शिराळा – शिराळा तालुक्यात झालेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात घट झाल्याने गुऱ्हाळघरांना त्याचा फटका बसला आहे. हा उद्योग सध्या संकटात सापडला आहे. कोल्हापूर व कराड मार्केटमध्ये चांगल्या प्रतिचा गूळ म्हणून ओळख असलेल्या शिराळा तालुक्यात कणदूर येथे यावर्षीच्या गुऱ्हाळ हंगामाला एक महिना उशिराने सुरुवात झाली आहे.
मात्र ऊस व कामगारांचा तुटवडा, गूळ उत्पादन साहित्याचे वाढलेले दर व गुळाला नसलेला अपेक्षित दर अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा उद्योग सापडला आहे. तर ही गुऱ्हाळ उद्योगासाठी धोक्याची घंटा आहे. परिणामी जूनमध्ये गुळाला 3 हजार 708 रूपये क्विंटलला असणारा भाव आता 4 हजार 200 रूपयांवर गेला आहे. अजूनही किमंतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
शिराळा व शाहुवाडी तालुक्यात काही मोजक्या ठिकाणी यावर्षीच्या गुऱ्हाळ हंगामाला आठवड्यापूर्वी सुरुवात झाली आहे.
दोन्ही तालुक्यात गुळ उद्योगाला पूर्वी चांगले दिवस होते. वारणाकाठच्या अनेक गावात गुऱ्हाळ ठिय्ये सुरू व्हायचे. गावातील 30 ते 40 शेतकऱ्यांना चार-पाच महिन्यांसाठी हक्काचा रोजगार मिळायचा. गुळ, काकवी, सोडागुळ, गुळवड्या, गुळमोदक याची प्रत्येक घराघरात वर्षाकाठीच्या गुळाची साठवण व्हायची. गूळ विकत घ्यावा लागत नव्हता. पण काळाच्या ओघात हे चित्र आता बदलले आहे.नुकताच बसलेला महापूराचा व अवकाळी पावसाचा मोठा फटका अपेक्षित दराचा अभाव, कामगारांचा तुटवडा, वाढलेला उत्पादन खर्च आदी समस्यांना गुऱ्हाळघर मालकांना तोंड द्यावे लागत आहे.
प्रत्येक वर्षी नविन समस्यांमुळे हा पारंपरिक उद्योग डबघाईला आला आहे.
शिराळा तालुका हा गूळ उद्योगाचे माहेरघर मानला जातो. मात्र येथील गुऱ्हाळ उद्योगाला गेल्या काही वर्षात घरघर लागली आहे. त्यामुळे असंख्य गुऱ्हाळ मालकांनी या उद्योगाकडे पाठ फिरवली आहे. त्यातच यावर्षी महापुराचा फटका बसल्याने गुऱ्हाळघर मालकांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. पडझडीमुळे काही
गावातील गुऱ्हाळघरे अद्यापही सुरू झालेली नाहीत.
ऊसाचा दर्जा चांगला नसल्यामुळे आधनाला जास्त ऊस लागणार आहे. गळीताचा दरही वाढण्याची चिन्हे आहेत. एका गुऱ्हाळ घरासाठी किमान 20 माणसांची गरज असते. सध्या मालकांना कामगार मिळेनासे झाले आहेत. गूळ साहित्याचे दर वाढलेले आहेत पण, गुळाला अपेक्षित दर मिळत नाही. भांडवलाची कमतरता आहे. कामगारांना पगार वाढवून व उचली द्याव्या लागत आहेत. अशा अनेक समस्यांमुळे शिराळा तालुक्यातील गूळ उद्योग संपण्याच्या मार्गावर आहे.
सध्या तालुक्यातील गुळाला 3 हजार रूपयांच्या आसपासच प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. शिवाय ऊसदराचाही तिढा अद्याप म्हणावा असा सुटला नसल्याने त्याचा गूळ उद्योगावर परिणाम होत आहे. काही वर्षांपूर्वी शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरांची संख्या 60 ते 70 च्या घरात होती. एकट्या कणदूर गावात सर्वाधिक अकरा गुऱ्हाळघरे होती. पैकी आता एकच राहिले आहे. शासनाने या उद्योगाकडे केलेले दुर्लक्ष, निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, कामगारांचा तुटवडा व गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे पाठ फिरवली असल्यामुळे पूर्वी शिराळा तालुक्यात असणारी 60 ते 70
गुऱ्हाळघरांची संख्या
आता हाताच्या बोटावर मोजण्या इतपत राहिली आहे.
तसेच गूळ बनविण्यासाठी आदनाचे समीकरण काढले तर एका आदनाला दोन टन चांगला ऊस लागतो. यातून अडीच ते तीन क्विंटल गुळ मिळतो. क्विंटलला सरासरी कमीत कमी 3 हजार रुपये दर मिळाला तर 7 हजार 500 ते 9 हजार रुपये होतात. यातून गळीत खर्च, तोडणी, वाहतूक, हमाली अशा बाबींचा खर्च वजा केल्यानंतर हातात केवळ पाच ते सहा हजार रुपये राहतात. कारखान्याच्या तुलनेत गुळात शेतकऱ्यांचा तोटा होतो. याचा परिणाम गुऱ्हाळ घरांवर झाला आहे. चालू वर्ळी आदनाच्या दरातही मोठी वाढ गुऱ्हाळमालकांना नाईलाजाने करावी लागणार आहे.