ना. सदाभाऊ खोत : माण-खटावचा पाणीप्रश्न जयकुमार गोरेच सोडवणार
खटाव – जयकुमार गोरेंचे नेतृत्व बहुजन आहे, ते अठरापगड जातींना बरोबर घेऊन जात आहेत, त्यांच्यामुळेच माण-खटावमधील 64 गावांना जिहेकठापूर आणि टेंभू योजनेचे पाणी मिळणार आहे, औंधसह अठरा गावांचा पाणीप्रश्नही जयकुमार गोरेंच्या माध्यमातून आम्हीच सोडवणार आहोत, असा विश्वास ना. सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
“आमचं ठरलंय’वाल्यांच्यात कोणीही साधुसंत नाही, त्यामुळे या बिनकामाच्या टोळक्याला एका झटक्यात झोपवा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. औंध येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जयकुमार गोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष विकल्प शहा, राजकुमार देशमुख, भरत जाधव आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, औंध गटातील माझ्या छोट्या छोट्या सहकाऱ्यांनी गेल्या दहा वर्षात चांगले संघटन केले आहे. जयकुमारच्या पाठिशी मोठी ताकद उभी राहिली आहे. गेल्या सात वर्षांपासून खटाव तालुक्यातील अनेक गावांमधून उरमोडीचे मी आणलेले पाणी वाहत आहे. अनेक गावांची परिस्थिती पाण्यामुळे बदलली आहे. 97 गावांमध्ये उरमोडीचे पोहचली आहे. आता 64 गावांमध्ये जिहेकठापूर आणि टेंभूचे पाणीआणत आहे. औंधसह सोळा गावांचा प्रश्नही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आमचं ठरलंय’वाल्यांचा पळशीकर दुपारनंतर बिनपाण्याची घेतो, त्यामुळे त्याचा आणि पाण्याचा संबंध येत नाही. मात्र तोच माझ्यावर तरुण पीढी बिघडवत असल्याचा हस्यास्पद आरोप करत आहे. जलसंपदा खात्याचे माजी मंत्री या भागात कायम येतात. मात्र, इथल्या सोळा गावांचा पाणीप्रश्न त्यांना काही सोडवता आला नाही. आता तो प्रश्न मी सोडवणार आहे. “ठरलंय’वाल्या उमेदवाराला आयुष्यात भ्रष्टाचार केला नाही असे यमाई देवीसमोर सांगायला लावा आणि मगच त्याचा प्रचार करा, असे अवाहनही त्यांनी केले. टेबलाखालून कमवलेला माल आता निवडणुकीत बाहेर निघाला आहे. धनशक्तीविरोधात माझी पाण्याची लढाई निश्चित जिंकणार आहे, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला.
“आमच्या गावात हजारो एकर ऊसाची शेती’
सभा सुरु असताना जयकुमार गोरेंनी कळंबी, वडी, गुरसाळे, अंबवडे, निमसोड येथील एकएका शेतकऱ्याला सात वर्षापूर्वीची आणि आत्ताची शेती याबद्दल प्रश्न विचारले. सर्वच शेतकऱ्यांनी त्यांच्या गावात जयकुमार गोरेंनी आणलेल्या उरमोडीच्या पाण्यामुळे हजारो एकर ऊसाची शेती होत असल्याचे सांगितले. या ऊसामुळेच तालुक्यात साखरकारखाने उभे राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.