पिरंगुट, (वार्ताहर) – येथील घाटालगत असलेल्या झोपडपट्टीजवळील मुख्य रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सहा दुचाकी गाड्या आगीत जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुचाकींना आग लावली की लागली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे शहरापाठोपाठ आता दुचाकी जाळण्याचे लोण ग्रामीण भागात पोचले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत पौड पोलिसांकडून मिळालेल्या माहितनुसार, याप्रकरणी तानाजी माने बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे. पिरंगुट घाटात असलेल्या झोपडपट्टी भागात बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली. बाहेर मोठ्या मोठ्याने आवाज येऊ लागल्याने झोपलेले नागरिक घराबाहेर आले.
त्यावेळी त्यांनी पाहिले असता बाहेर उभे असलेल्या दुचाकी जळत होत्या. नागरिकांनी दुचाकींना लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. या घटनेत सहा दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अधिक तपास पौड पोलीस करीत आहेत.