पिरंगुट, (वार्ताहर) – पुणे ते दिघीबंदर महामार्गाचे काम अनेक ठिकाणी पूर्ण होत आलेले असून या रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम मात्र अपूर्ण राहिलेले आहे. पिरंगुट पोलिस चौकीजवळील महत्त्वाचा आणि मोठा असलेला पूलाचे काम सुरू करण्याचे नियोजन ठेकेदाराचे असून हा पूल पाडण्यात येणार आहे.
तर शेजारीच माती व दगड टाकून नवीन रस्ता ठेकेदाराने तयार केलेला असून हा पूल दोन महिन्यात पूर्ण झाला नाही, तर पाण्याच्या प्रवाहाने माती व दगड वाहून जाऊन रस्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे पूल पाडल्यानंतर पुढील दोन महिन्यात नवीन पूल तयार होणार का हा यक्ष प्रश्न सर्व मुळशीकर आणि वाहनचालकांना पडलेला आहे.
पिरंगुट ओढ्यावरील पुलाशेजारी ओढ्यात भर टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात येत आहे. पुलाखालून ओढ्यातले पाणी जाण्यासाठी अंदाजे २ ते अडीच फूट रुंदीच्या केवळ दोन सिमेंट पाईपची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात हा ओढा तुडुंब भरून वाहत असतो व पावसाळाही अगदी २ महिन्यांवर येऊन ठेपला असल्याने हा मातीचा पूल पावसात वाहून जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मातीच्या पुलाला पाणी जाण्यासाठी कमीत कमी १२ फूट रुंदीचे (उंची) किमान ६ सिमेंटचे पाईप आवश्यक आहेत. पावसाच्या पाण्याचा प्रवाह उरवडे गावावरून येत असल्याने त्याचा दबाव प्रचंड येत असतो. त्याला सहन करण्यासाठी व पाणी योग्य व उचित क्षमतेने निचरा होण्यासाठी योग्य सोय करण्यात आली तरच हा तात्पुरता पूल टिकू शकतो, अन्यथा पावसाळ्यात हा पूल वाहून जाऊन प्रवास करणाऱ्यांच्या बाबतीत दुर्घटना होऊ शकते.
लवकरच पाहणी करणार
आम्ही दोन दिवसात स्थळ पाहणी करणार आहोत. त्यानंतर आवश्यक असेल तर बदल करायला सांगू शकतो. मात्र, काम सुरू होईल की नाही याचा निर्णय दोन दिवसात होईल. या पुलाच्या कामासाठी महावितरणकडून युटिलिटी शिफ्टिंग अंतर्गत लवकर अंदाजपत्रक न मिळाल्याने कामास विलंब झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नवनियुक्त अधिकारी शैलजा पाटील यांनी सांगितले.
महावितरणचे अधिकारी आनंद घुले यांनी सांगितले की, दोन तीन महिन्यापूर्वीच अंदाजपत्रक व ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. सोबतच मागणीनुसार या कामासाठी स्थानिक ठेकेदारही उपलब्ध करून दिला आहे. मात्र काम का होत नाही, याबद्दल माहीत नाही.