मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील गडकिल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. या गडकिल्ल्यांवर गेल्या काही काळात दारूपार्ट्या करून धिंगाणा घालण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा दारूपार्ट्या करून गडकिल्ल्यांवर धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांना अटकाव करण्यासाठी सहा महिन्यांचा सश्रम कारावास तसेच दहा हजार रूपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या गृहविभागाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात साडेतीनशेच्यावर गडकिल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत हे किल्ले शेकडो वर्षे उभे आहेत. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्यांवर गेल्या काही काळात पावित्र्य भंग होईल अशा गोष्टी सातत्याने उजेडात येत आहेत. या किल्ल्यांना पिकनिकस्पॉट समजून पार्ट्या करणे, दारू पिउन धिंगाणा घालण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा तळीरामांना अनेक शिवप्रेमींनी चोप दिल्याचेही दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 85 अंतर्गत आता कारवाई करण्यात येणार आहे. दारू पिउन गडकिल्ल्यांवर धिंगाणा घालणाऱ्यांना आता सहा महिन्यांची कैद तसेच दहा हजार रूपये दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याच्यांवर पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. पुन्हा अशा अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास शिक्षेचा कालावधी एका वर्षाचा असणार आहे. या शिक्षेबाबतच्या असलेल्या तरतुदी सर्व गडकिल्ले व पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागात जनतेच्या माहितीस्तव लावण्यात येणार आहेत.