एखादा परिसरच मनाला मोह पाडणारा असतो. तिथे गेलं की मन शांत होतं. काही वेळा आठवणीचे पापुद्रे निघतात. काही वेळा तिथला इतिहास जागा होतो. मर्ढे गावातला कृष्णाकाठ असाच आहे .
मर्ढेकरांच्या स्मारकाचे उद्घाटन कवयित्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी या कृष्णा काठाला भेट द्यायची संधी प्राप्त झाली. आता घाट बांधलेला आहे. जेंव्हा मर्ढेकर लहानपणी तिथे राहत असतील तेव्हा कदाचित हा घाट बांधीव नसेलही. कृष्णेचे वाहणारे पाणी, त्या काठची झाडी आणि मनाला शांत होणारा असा भोवताल मात्र तेव्हाही असणारच. या वातावरणात मर्ढेकर पूर्वी कितीतरी वेळा इथे आले असतील. त्यांच्या लहानपणच्या पाऊलखुणा या घाटावरून भल्या अदृश्य झालेल्या असतील. पण आता जेव्हा जेव्हा लोक त्याच मार्गाला भेट देतील, तेव्हा मर्ढेकरांच्या सगळ्या कविता त्या वाचकांच्या मनात पाऊलखुणा उमटवून जातील हे मात्र नक्की.
मर्ढेकरांसारखा एखादा कवी कवितेची स्वतःची वेगळी वाट निर्माण करतो. कवितेत वेगळी प्रतिकं वापरतो, वेगळ्या प्रतिमा निर्माण करतो, ज्या यापूर्वी खचितच कोणीतरी वापरले असतील. महायुद्धानंतर माणसाची झालेली वाताहत, महानगरीय बदलणारा भोवताल आणि त्यात निर्माण झालेले वातावरण या सगळ्यांचं एक सजग प्रतिबिंब मर्ढेकरांच्या कवितेत दिसते. मग ती फलाट दादा सारखी कविता असू दे किंवा पिंपात मेल्या ओल्या उंदीर सारखी कविता असू दे. मर्ढेकर यांनी कवितेला वेगळा आयाम दिला. नव्या युगाची कविता म्हणून त्यांच्या कवितेकडे पाहिलं गेलं. ते युगप्रवर्तक कवी ठरले. काहींना मर्ढेकरांची कविता आवडली. त्यांनी त्यांचे रसग्रहण केले.
त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर काहींना ती समजली नाही आणि त्यांनी त्यात काही अश्लील आहे असं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अश्लीलतेचा खटला भरण्यापर्यंत लोकांची मजल गेली. मर्ढेकर सत्यनिष्ठ होते. ते त्यांच्या कवितेसोबत राहिले. कवितेच्या सत्यासोबत राहिले, कवितेच्या अर्थाबाबत ठाम राहिले. त्यामुळे त्यांची कविता चिरंजीव उरली.
कवी जेव्हा आपल्या भावनांशी प्रामाणिक असतो आणि मनातली व्यक्तता शांतपणे, धीटपणे आणि सजगपणे व्यक्त करतो. तेव्हा त्याची कविता त्याच्या जाण्यानंतर ही जिवंत राहते. मर्ढेकरांच्या मनाचा पैस हा कायम कृष्णाकाठी संलग्न राहिला असावा. निवृत्तीनंतरही सुद्धा पुन्हा मर्ढे इथे यावं, राहावं, पुन्हा नदीमध्ये डुंबावं असं त्यांच्या मनात होतं पण ते घडलं नाही.
इतके वर्षे त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा त्यांचं ते घर त्यांची वाट बघत राहिल असावं. त्या घरालाही त्यांची इतकी वर्ष ओढ असेलच. वास्तू काही वेळा तशा अर्थानं जिवंत असतात. कानेकोपरे सुध्दां आठवणींचे चतकोर सांभाळत युगे युगे श्वास घेत राहत असतील असं वाटतं.
तिथल्या जमिनीलाच काय पण छतालाही मर्ढेकरांच्या शब्दांची उब लाभली असेल.
मधल्या काळात ही वास्तू थकली होती. भिंती दमगीर झाल्या होत्या, थकल्या होत्या, छताचे पत्रे पावसाळ्यात अश्रू ढाळायचे तर उन्हाळ्यात जमिनीवर कवडसे टाकत रांगोळी घालायचे. भुई आठवणींचे ढपले उमलवायची. बरीच वर्षे हिराबाई निकम या घराला सावरीत त्याच वास्तूच्या आश्रयाने राहत आहेत. त्याआधी त्यांचे आईवडील या वास्तूत राहयचे. आता हिराबाईंनी सत्तरी पार केली असावी.
आता या वास्तूला महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपूरीचे विनोद कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन नवं रुप देऊन तिचं मर्ढेकरांच्या स्मारकात रुपांतरीत केलं. भिंतींची रुपें बदलून त्या मर्ढेकरांच्या कवितेचं साज ल्यायल्या. तुळयांनी तेल पाण्यात न्हावून घेतलं, छतांनी नवी शाल पांघरली. भुई नव्या नवतीसारखी लखलखून आली. वास्तूचे श्वास मर्ढेकरांच्या कवितेचे शब्द झाले. जणू निर्गुण रुपात मर्ढेकर तिथे वास्तव्याला आले. या वास्तूच्या दाराची कडी वाजवून स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं, तेव्हा जणू मर्ढेकरच दरवाजा उघडून त्यांच्या वाचक रसिकांच्या सामोरी पुन्हा त्यांच्या कविताच्या रुपाने आले. भिंतीवरचा गणपत वाणी काडी चावताना थांबला, फलाटावरची गाडी मंदावली, पिपातले मेलेले उंदीर कुस बदलून पुन्हा चेतल्यासाखे झाले. वास्तूचं हृदय पुन्हा चैतन्यानं धडाडू लागलं. शेजारून शांतपणे वाहणारी कृष्णामाई क्षणकाल स्तब्ध झाली. मर्ढेकर आल्याची पायरव जणू तिलाही लागली असावी. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबल म्हणणारे मर्ढेकर घाटाच्या पायऱ्या उतरीत पुन्हा तिच्या प्रवाहाशी येतील याची आस तिला लागली असेल. काही दिवसांनी तरुण कवींचा,
रसिकांचा वावर येथे वाढेल आणि कोणी कवी मर्ढेकराच्या स्मारकातच भंगू दे काठिण्य माझे आम्ल मनीचे जाऊ दे असे म्हणत द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा असे मोठ्याने म्हणत राहील, तेव्हा मर्ढेकरसुद्धा भरून पावतील. खऱ्या अर्थाने कवितेचा वसा पुढे चालत राहिल. या स्मारकासाठी खूप जणांनी मनापासून कष्ट घेतले. रवींद्र बेडकिहाळ, मिलिंद जोशी, अगदी नंदकुमार सावंत यांच्यापर्यंत सर्व श्रमले यासाठी. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या रूपाने मदत व राजाश्रय प्राप्त झाला. मर्ढे कवितांचे गाव म्हणून ओळखले जावे असा प्रयत्न करणेचे आश्वस्तपण त्यांनी बोलून दाखवले.
सगळ्यांनी ही वास्तू जागती केली. त्यापलिकडे जाऊन मर्ढेकरांची कविता नवीन पिढीच्या मनचौथऱ्यावर वसवण्याचा प्रयत्न केला. कविता सांभाळणं हा सुद्धा चैतन्याचा वसा आहे. पिढ्यानं पिढ्या चालणारा. कवी जातो मात्र कविता त्याचा वारसा सांगत मागे उरते. वारसदार म्हणून. स्मारकाच्या उद्घाटनाची गजबज संपल्यावर आलेली माणसे निघून गेल्यावर पुन्हा सचेतन शांतता मागे उरेल. अजून हिराबाई त्या वास्तूच्या सोबतीनं तिथं रहाणार आहेत. पण आता त्या एकट्या नसतील त्यांच्या सोबतीला आता मर्ढेकरांच्या कविता आल्या आहेत. त्यांचा राबता घरात वाढला आहे.