जळोची – रोहित पवार केव्हापासून राज्याचे नेते झाले आहेत की, त्यांच्या वक्त्यावर मी भाष्य करावे…असे म्हणत विखे पाटील यांनी प्रतिक्रिया न देता रोहित पवारांवर निशाणा साधला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बारामती येथील विमानतळावर आले असता यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. एमआयएम पक्षाला भाजप पैसे देते. म्हणूनच एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडतात. असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता.
गौतम आदानी यांनी राज्य सरकारमधील एका मंत्र्याच्या खात्यावर दीडशे कोटी रुपये टाकले आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे. यावर ते म्हणाले की, विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारण विरोध करणाऱ्यांची मालिका पाहिली तर ते केवळ मोघम आरोप करतात. जनतेच्या मनात संशय निर्माण करतात. मोघम नाव घेण्यापेक्षा त्या मंत्र्याचे नावच जाहीर करायला पाहिजे. नाव सांगण्यापासून त्यांना कोणी थांबवले आहे का, असा सवाल त्यांनी केला.
भाजप विरोधात बोलले किंवा विरोधात काम केले तर भाजप त्याला बदनाम करते. ईडी, इन्कम टॅक्स मागे लावते, असा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावर ते म्हणाले की, त्यांना सरकार गेल्याचे एक वैफल्य आहे. स्वतःचा पक्ष ते सांभाळू शकले नाहीत. त्याचे एक वैफल्य आहे. या वैफल्ल्यामधून त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. यातून ते असे वक्तव्य करतात..
प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे चप्पल फेक झाली. याबाबत ते म्हणाले की, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यातून असे प्रकार घडत चालले तर सद्यस्थितीत अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. भविष्यात अशा घटना घडू नयेत याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वेळोवेळी सरकारची भूमिका मांडत आहेत. सध्या सभागृह सुरू आहे.. उद्या त्याबद्दल आणखी काही भाष्य करू, असे त्यांनी सांगितले.