मुंबई, दि. 18 – सचिन वाझे प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्येही फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार कॉंग्रेसमध्येही अंतर्गत बदल केले जाणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते दिल्लीला जाणार आहेत. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सुनिल केदार हे नेते दिल्लीत पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्लीत कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दोन दिवस गाठीभेटी होणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यातील कॉंग्रेस धोरण, अडचणीत आलेले मुद्दे, पक्षाअंतर्गत असलेल्या नाराजीवर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तीन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
यावेळी तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास एकमत व्यक्त केले. मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लवकरच तुम्हाला याबद्दल कळेल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, होळी आणि पौर्णिमेनंतर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचे खाते हे बदलले जाणार आहे.
दरम्यान, अनिल देशमुख हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. गेले वर्षभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे.
तसेच शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही शिवसनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
कॉंग्रेसमध्येही अंतर्गत बदल
कॉंग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत बदल केले जाणार आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नितीन राऊत यांना टीकेचा सामना करावा लागला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारले गेले होते पण त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेसकडे असलेल्या काही खात्यांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे.