कोलकाता, दि. 18 – तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा नेत्या ममता बॅनर्जी यांनी विधानसभेच्या निवडणूकीसाठी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध केला. सर्व कुटुंबीयांना मासिक किमान उत्पन्नाची हमी, उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्डची योजना आणि काही मागासवर्गीय समुदायांना इतर मागासवर्गीय वर्गात समावेश करण्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचे अश्वासन या जाहिरनाम्यात देण्यात आले आहे.
राज्यातील दारिद्रय 40 टक्क्यांनी कमी करण्यात आले असल्याचा दावाही जाहिरनाम्यात करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये “पीएम किसान सम्मान निधी’ योजनेची अंमलबजावणी केलेली नाही.
म्हणून त्यांच्यावर टीका होत होती. मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारी आर्थिक मदत 6 हजार रुपयांवरून वाढवून 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. याशिवाय दरवर्षी 5 लाख रोजगार उपलब्ध करणे, पाच वर्षात 2 हजार उद्योग सुरू करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
“दिदींचे 10 निश्चय’ असे नाव असलेल्या जाहिरनाम्यामध्ये अर्थव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सुधारणा, रोजगार निर्मिती, अन्न सुरक्षा आणि लोकांना परवडणारी घरे, वीज आणि बंद पाइपलाइनने पाणी उपलब्ध करुन देणाऱ्या प्रकल्पांची यादी देण्यात आली आहेत. मात्र ही आश्वासने म्हणजे नागरिकांना मूर्ख बनवण्यासाठीचा “जुमला’ असल्याची टीका भाजपने केली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणूकीच्यावेळी कॉंग्रेसने किमान उत्पन्नाचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणेच ममता बॅनर्जी यांनी राज्यातील 49 टक्के मतदार असलेल्या राज्यातील पालक महिलांना दर महिन्याला 500 रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.
अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीय जातींसाठी ही मदत 1 हजार रुपये असणार आहे. वयाच्या 18 वर्षांनंतरच्या विधवांना दरमहा 1 हजार रुपयांच्या पेन्शन आणि राज्यातील 1.5 कोटी कुटुंबांना घरपोच रेशन पुरवण्याच्या योजनेचीही घोषणा बॅनर्जी यांनी केली आहे.