पिंपरी – करोना आजारापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे ऍलोपेथी, आयुर्वेदाची अनेक औषधे बाजारात नव्याने आली आहेत. मात्र, या औषधांच्या अतिसेवनाने शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पुरळ येणे व अन्य त्रासदायक समस्येला सामोरे जावे लागण्याचा इशारा तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
विविध माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहे. या जाहिरातींमध्ये प्रत्यक्ष करोनापासून बचाव करण्याचा दावा केला जातो. करोना आजार पसरत असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी या विचाराने लोक औषधे घेतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे धोक्याचे ठरू शकते. खास करोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती विशेष अशी औषधे असल्याचे संशोधन अद्याप तरी झालेले नाही.
आयुर्वेद तसेच ऍलोपेथीमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक यासारखी औषधे असतात. ही औषधे कमी घ्यावीत व किती प्रमाणात घ्यावी हे तपासणीनंतरच कळू शकते. प्रत्येकाची उंची, वजन, वय यानुसार औषधांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्री देखील वेगळी असते. त्यामुळे एकच औषध तितक्याच प्रमाणात सर्वच व्यक्तींना लागू पडेल असे नाही. यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी करूनच औषधे घ्यायला हवी.
डॉक्टरांना ठरवू द्या
कामामुळे बाहेर पडावे लागते. बाहेर जास्त वेळ थांबून काम करावे लागते. जास्त लोकांशी संपर्क येतो, म्हणून रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषधांची जास्त गरज असते. असे समजून लोक अशी औषधे घेतात. यामुळे उष्णता वाढणे, पुरळ येणे, बेंड येणे असे साईट इफेक्टस दिसायला लागू शकतात. आपल्याला कोणते औषध जास्त परिणामकारक व साईड इफेक्ट न करणारे आहेत हे पाहावे लागेल. त्यामुळे कोणते औषध घ्यायचे ते डॉक्टरांना ठरवू द्या.
करोनासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणीही औषधे घेऊ नये. डॉक्टर रुग्णांला व्यवस्थित तपासून मगच औषध देत असतात. स्वतःहून औषधे घेतल्यास साईड इफेक्टस होऊ शकतात. तसेच सर्वांनी नेहमी मास्क लावावा. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यास आपल्याला यश येईल.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी.