भारतीय सैन्यावर आणि जवानांच्या शौर्यावर आतापर्यंत बरेच सिनेमे येऊन गेले. पूर्वी बॉर्डर, एलओसी-कारगिल आणि अलीकडील काळात उरी- सर्जिकल स्ट्राईक, गाझी ऍटॅक असे बरेच सिनेमे येऊन गेले आणि त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती. सर्वसामान्यांना देशप्रेमाने भारून टाकणाऱ्या अशा सिनेमांची शृंखला सुरूच राहिली आहे. आता सियाचीनवरील भारतीय जवानांच्या शौर्यावरही सिनेमा येतो आहे. सियाचीन वॉरिअर्स असेच या सिनेमाचे नाव आहे.
नितीश तिवारी आणि अश्विनी अय्यर तिवारीचे प्रॉडक्शन असलेला सियाचीन वॉरिअर्स हा सत्य घटनेवर आधारित असणार आहे. सिनेमात कोण कलाकार असणार आहेत, युद्धाच्या कोणत्या घटनेवर याची कथा आधारलेली असेल आणि सिनेमाची रिलीज डेट कोणती असेल, याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही.
नितीश तिवारीने यापूर्वी दंगल आणि छिछोरेसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. तर दुसरीकडे अश्विनी अय्यर तिवारीने पंगाचे डायरेक्शन केले आहे. सियाचीन वॉरिअर्सची माहिती करण जोहरने ट्विटरवर दिली आहे. करण जोहरचा तख्तफ आणि ब्रम्हास्त्र रिलीज होण्याच्या तयारीत आहेत. कदाचित सियाचीन वॉरिअर्सची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी करण जोहरने स्वतःकडे घेतलेली असावी.