सुरेश डुबल
कराडचे आद्य ग्रामदैवत; नवरात्रोत्सवात पार पडले धार्मिक कार्यक्रम
कराड – नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. कराड शहराच्या दक्षिणेस निमजग्याच्या माळावर इ. स. अकराशे साली प्राणप्रतिष्ठापना झालेल्या व आत्ता सोमवार पेठेतील भैरोबा गल्लीत विराजमान असलेल्या या ऐतिहासिक श्री उत्तरालक्ष्मी देवीची महती मोठी आहे. या मंदिरातही धार्मिक कार्यक्रम वर्षांनुवर्षे पार पडत आहेत. प्रती वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीत देवीची विविध रुपात पूजा बांधली तसेच भजन-कीर्तन यासारखे कार्यक्रम पार पडले.
कराड हे ऐतिहासिक शहर असून पूर्वी करहाटक म्हणून शहराला ओळखले जात होते. शहराच्या दक्षिणेला श्री उत्तरालक्ष्मीचे मूळ मंदिर होते. हे मंदिर इतके मोठे होते की, या मंदिराच्या शिखराचे प्रतिबिंब कोयना नदीच्या पात्रात दिसत होते, अशी आख्यायिका प्रचलित आहे. मंदिरातील मूर्ती काळ्या शाळीग्रामच्या दगडात एका चौकोनी पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीची उंची 21 इंच व रुंदी 16 इंच आहे. महिषासुरमर्दिनी च्या रुपात ही मूर्ती असून देवीला दशभुजा आहेत. देवीचा उजवा पाय रेड्याच्या अंगावर दाबलेला असून दहाही हातात आयुधे आहेत.
इ. स. अकराव्या शतकात शिलाहार राजाने निमजजग्याच्या माळावर हे मंदिर बांधले होते. तेव्हा कराड हा प्रांत शिलाहार राजाच्या ताब्यात होता. या राजाची कन्या चंद्रलेखा हिचा विवाह चालुक्य राजा सम्राट शककर्ता विक्रमादित्य यांच्याबरोबर कराड येथे झाला. कराड ही त्यांची राजधानी होती. मात्र काही काळानंतर ती कोल्हापूर येथे हलवण्यात आली.
या चालुक्य राजाचे कराड प्रांतावर इ. स. 550 ते 1100 पर्यंत राज्य होते. या काळात या राजांनी दक्षिण भारतात बरीच मोठी मंदिरे बांधली होती. त्यापैकी उत्तरलक्ष्मी मंदिर हे देखील होय. चालुक्यांचे वंशज बाळोजी साळोखे डुबल हे कराड प्रांताचे मुख्य वतनदार होते.
इ. स. 1250 ते 1600 या काळात महाराष्ट्रात मुस्लीम राजवट होती. यावेळी मुस्लीम आक्रमणा दरम्यान कराडचे श्री उत्तरा लक्ष्मीचे मंदिर पाडले गेले. परंतु श्रीमंत शिवाजी साळोखे डुबल यांनी आक्रमणापूर्वी श्री उत्तरा लक्ष्मीची मूर्ती मंदिरातून काढून कृष्णा नदीच्या पात्रात लपवून ठेवली होती. त्यानंतर सोमवार पेठेतील भैरोबा गल्लीत इ. स. 1727 मध्ये या मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली.
त्यानंतर सन 1955 नंतर येथील चंद्रहास पुजारी यांनी मंदिराची बरीच नवीन कामे केली. सध्या बाळोजी साळुंखे यांच्या वंशजांनी उत्तरालक्ष्मीच्या मंदिराच्या शिखराचे जीर्णोद्धाराचे काम चालू केले आहे. या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या विविध रुपातील पूजा बांधण्यात आल्या होत्या. तसेच देवीची अलंकारसह पूजा, सप्तपदी पाठ वाचन, भजन-कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
दरवर्षी माघ पौर्णिमेस देवीचा मोठा उत्सव असतो. यात कराड व परिसरातील भाविक उपस्थित राहून देवीची भक्तिभावाने सेवा करतात.