मुंबई : गेले काही महिने संपूर्ण जगाला कोरोनाने ग्रासले असून मराठी सिनेसृष्टीची व टीव्ही जगताची परिस्थितीही त्यामुळे नाजूकच बनली आहे. या साथीच्या रोगामध्ये अनेक अभिनेते काळाच्या पडद्याआड गेलेच, शिवाय अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्यांना गामावले. असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता श्रेयस राजे. स्टार प्रवाह वरील ‘मोलकरीणबाई’ मध्ये श्रेयस एक महत्वाची भूमिका करत होता.
अचानक लॉकडाऊन सुरु झाले आणि “मोलकरीणबाई’चे शूटिंगही थांबले. अशातच श्रेयसच्या बाबांना कोरोनाची लागण झाली. पुढील दिवसाच त्याची स्वतःची टेस्ट देखील पॉझिटीव्ह आली. काही दिवसांत श्रेयसच्या बाबांचा करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्या विचित्र परिस्थितीमुळे त्याच्या हातात कुठलेच काम उरले नाही.
पण विश्वासाने ‘जो होता हैं अच्छे के लिये होता हैं’ मानणारा श्रेयस अजूनही आयुष्याशी हरला नाही. दोनच महिन्यांत त्याला सोनी मराठीवरील ‘जिगरबाज’ या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. काही दिवसातच त्याच्या डॉ. वरूण बापट या पात्राने प्रेक्षकांचे मन जिंकले. ‘मोलकरीणबाई’तून निरोप घेतल्यावर श्रेयसकडे कामच उरले नव्हते. पण गमावलेल्या संधीपेक्षाही मोठी संधी आपण आपल्या जिद्दीने व अथक प्रयत्नांनी कशी निर्माण करू शकतो, हे मात्र या श्रेयसने सिद्ध केले आहे.