BCCI Central Contract :- भारताचे ईशान किशन व श्रेयस अय्यरवर बीसीसीआयने संताप व्यक्त केला असून या दोघांवर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. ईशान व अय्यर रणजी स्पर्धेत न खेळण्याची ही शिक्षा मिळणार आहे. बीसीसीआय या दोघांचा केंद्रीय करार रद्द करण्याची शक्यता आहे. या दोघांनीही रणजी स्पर्धेपेक्षा आयपीएलला जास्त महत्व दिल्याने ही कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अय्यरला मार्चच्या केंद्रीय करारात ब गटात समाविष्ट केले होते. या कराराअंतर्गत श्रेयसला वर्षाला ३ कोटी रूपये मिळतात. ईशानचा क गटात समावेश आहे. त्याला वर्षाला १ कोटी रूपये मिळतात. बीसीसीआय येत्या काही दिवसांत नव्या केंद्रीय कराराची घोषणा करण्याची शक्यता असून त्यातून या दोन खेळाडूंना वगळले जाणार आहे.
अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमितीने २०२४ सालासाठी करारबद्ध करायच्या खेळाडूंची यादी निश्चित केली आहे. या यादीची घोषणा लवकरतच होण्याची शक्यता आहे. यातून ईशान आणि श्रेयस यांना वगळण्याची शक्यता आहे. कारण हे दोघेही बीसीसीआयच्या आदेशानंतरही रणजी करंडक स्पर्धेत खेळले नाहीत. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यापूर्वीच प्रत्येक करारबद्द खेळाडूला मेल करून रणजी खेळणे बंधनकारक केले होते.
Ishan Kishan : फटकारल्यानंतरही इशानचा ‘बीसीसीआय’शी पुन्हा पंगा; BCCI मोठी कारवाई करणार का?
ईशानने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली होती. त्यानंतर तो मैदानावर परतलेला नाही. आता तो थेट आयपीएल खेळण्याची शक्यता आहे. तो काही दिवसांपूर्वी बडोद्यात हार्दिक व कृणाल या पंड्या बंधूंसह सराव करताना दिसला होता. अय्यरला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळाले नाही. बीसीसीआयने अय्यरला वगळण्याचे कारण सांगितले नव्हते. अय्यरनेही रणजी स्पर्धा खेळणे टाळले. तसेच पाठीच्या दुखण्याचे कारण देत बाद फेरीतून देखील माघार घेतली होती.