Ishan Kishan & BCCI :- इशान किशनने रणजी स्पर्धेत खेळण्यापासून पुन्हा एकदा माघार घेतली आहे. आता त्याने थेट बीसीसीआयशीच पंगा घेतल्याने त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देशांतर्गत रणजी तसेच अन्य स्पर्धांमध्ये इशान झारखंडकडून खेळतो.
सध्या भारतात सुरु असलेल्या रणजी स्पर्धेच्या एलिट गटाची अखेरची साखळी फेरी शुक्रवारपासून सुरु झाली. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने इशानसह अन्य काही खेळाडूंना या सामन्यात खेळण्याचे आदेश दिले होते मात्र, तरीही इशानने या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला. आता तो जो सराव करत आहे तो केवळ आयपीएल स्पर्धेसाठीच असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बीसीसीआयच्या सुत्रांनी संताप व्यक्त केला आहे. आयपीएलच्या आधी देशांतर्गत रणजी स्पर्धेत खेळा असे आदेश बीसीसीआयने दिले होते, त्याच आदेशाला शानने केराची टोपली दाखवली आहे. आता त्याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन होणार का ते देखील बीसीसीआयच्या निर्णयानंतर समोर येणार आहे.
बीसीसीआय आदेशानुसार काही ठरावीक संख्येने देशांतर्गत स्पर्धेत एखादा खेळाडू खेळला नसेल तर त्याचा राष्ट्रीय संघातील निवडीसाठी विचार केल जाणार नसल्याचेही सांगितले गेले होते तरीही इशानने हा सामना टाळल्याने एकप्रकारे त्याने त्याच्या कारकीर्दीशीच खेळ केला आहे. इशानसह दीपक चहर व श्रेयस अय्यर यांनाही रणजी खेळण्याची सुचना करण्यात आली होती. मात्र, या दोघांनाही दुखापतींनी त्रस्त केल्यामुळे त्यानी या सामन्यातून माघार घेतली आहे. त्यांच्या दुखापतीमुळे बीसीसीआय त्यांच्याबाबत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे समजते.
सातत्याने सामने खेळणे व त्यासाठी सातत्याने प्रवास करणे यातून थकल्यामुळे इशानमे बीसीसीआयची परवानगी घेत दक्षिण आफ्रिकेचा दौरा अर्धवट सोडून विश्रांती घेत मायदेशी परतला होता. मात्र, त्यानंतर तो घरी विश्रांती घेण्याच्या जागी विविध कार्यक्रमात तसेच वेगवेगळ्या पार्टींमध्ये रमल्याचे व्हीडीओही व्हायरल झाले होते. त्यामुळेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इशानला जर राष्ट्रीय संघात परत यायचे असेल तर देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता, तो इशानने धूडकावून लावत बडोदात माजी कसोटी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्या अकादमीत सराव सुरु केला होता.
MS Dhoni : खेळावर व संघावर निष्ठा ठेवली तर यश निश्चितच मिळेल – धोनी
या सरावात इशानसह हार्दिक व कृणाल हे पंड्या बंधूही सहभागी झाले होते. त्यावेळी इशान सराव करत असल्याचे उघड झाल्यावर त्याने देशांतर्गत स्पर्धेत खेळावे असे फर्मानही बीसीसीआयने जारी केले होते. मात्र, त्याने या दोघांनाही हरताळ फासला व आयपीएलची तयारी सुरु केल्याचे समोर आल्यामुळे आता तो बीसीसीआयच्या कोणत्या कठोर कारवाईचा सामना करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आयपीएल To आयपीएलवर संताप
बीसीसीआयने आयपीएल टी आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंचा राष्ट्रीय संघातील निवडीसाठी विचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही खेळाडू राष्ट्रीय संघातून विश्रांतीचे कारणे देत किंवा दुखापतींचे कारण देत बाहेर राहतात व आयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधी ते पूर्ण तंदुरुस्त ठरतात व सराव सुरु करतात. यावरच आता बीसीसीआयने आक्षेप घेतला आहे. पुढील काळात यापेक्षाही मोठी काही कारवाई करण्याची बीसीसीआयकडून तयारी सुरु झाल्याचेही समजत आहे.
गंभीरचीही टीका
भारतीय संघातील अनेक खेळाडू विश्रांतीचे कारण देत महत्वाच्या मालिकांमधून माघार घेतात. तसेच काही खेळाडू दुखापत झाल्याचेही कारण देतात मात्र, आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ते पूर्ण फिट ठरतात ही जादू कशी होते अशी उपरोधिक टीका माजी कसोटीपटू गौतम गंभीरनेही केली आहे. असे काही खेळाडू हे सगळे मुद्दाम करत असतील तर त्यांना प्रत्येक मोसमात देशातर्गत स्पर्धेतील काही सामने खेळल्याशिवाय आयपीएलच्या लिलावातही स्थान देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणीही गंभीरने केली आहे.