Ranji Trophy 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू श्रेयस अय्यर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला. अलीकडे अय्यरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक करारातूनही बाहेर फेकले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये न खेळल्याने अय्यर चर्चेत होता. मात्र आता तो रणजी स्पर्धेतून मैदानात परतला आहे. पण हे पुनरागमन अय्यरसाठी चांगले नव्हते. अवघ्या 3 धावा करून तो बाद झाला.
वास्तविक, रणजी ट्रॉफी 2023-24 चा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात अय्यर मुंबईसाठी पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. 8 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 धावा केल्या आणि तो बाद झाला. संदीप वारियरने अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
याआधीही श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील सामन्यातही विशेष काही करता आले नव्हते. हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात 35 धावा आणि दुसऱ्या डावात केवळ 13 धावा करून तो बाद झाला. त्याचबरोबर विशाखापट्टणम कसोटीतही तो विशेष काही करू शकला नाही. पहिल्या डावात 27 आणि दुसऱ्या डावात 29 धावा करून अय्यर बाद झाला. मात्र, याआधी अय्यरने अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, मात्र तो सध्या सतत फ्लाॅप ठरत आहेत. अय्यरने कसोटी कारकीर्दितील 14 सामन्यांमध्ये एकूण 811 धावांची नोंद केली असून यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.
#RanjiTrophy2024 #MUMvTN #SF2 : मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे तामिळनाडु भुईसपाट…
रणजी स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या या सामन्यात तामिळनाडूचा संघ विशेष काही करू शकला नाही हे विशेष. तामिळनाडू 146 धावा करून सर्वबाद झाला. यादरम्यान विजय शंकर 109 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. प्रत्युत्तरात वृत्त लिहिपर्यंत मुंबईने 9 बाद 322 धावा केल्या होत्या. यादरम्यान मुशीर खान अर्धशतक तर शार्दुल ठाकूर शतक झळकावून बाद झाला. मुशीरने 131 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. मुशीरने 6 चौकार मारले. शार्दुल ठाकूरने शानदार शतक झळकावले. तो 109 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार अन् 4 षटकार लगावले.