वाल्हे – जून महिना संपून जुलै सुरू झाला. अद्याप मोसमी पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरी लागली नाही. जमिनीत चार इंचही ओलावा नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या महिन्यात पीक कोळपणीला येते.यंदा मात्र उलट चित्र असून, शिवारे पावसाअभावी कोरडी दिसून येत आहेत.
यंदाचा बेंदूर कोरडाच गेला आहे. कोरड्या रानाला नैवेद्य दाखवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रतिवर्षी जूनच्या प्रारंभी मोसमी पावसाला अपेक्षित प्रारंभ होतो. यंदा, मात्र जिल्ह्यात परिसरात उलट चित्र आहे.संपूर्ण जून कोरडाच गेला आहे. जुलै सुरू झाला आहे. केवळ रिपरिप सुरू झाली आहे. मात्र, पावसाचा जोर अद्याप नाही. कधी ढगाळ वातावरण तरी कधी ऊन असे चित्र पुरंदर तालुक्यात दिसून येत आहे.
यंदा उन्हाळ्यातही अवकाळीपावसाने झोपून काढत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरत, पेरणीपूर्व मशागतीची कामे संपवून बी-बियाणे व रासायनिक खतांची खरेदी ही अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करताना त्यांच्या नाकी नऊ आली.
दरम्यान, जमिनीत पुरेसा ओलावा नाही. चार इंचही ओल गेलेली नाही. पुरेशा ओलाव्याअभावी खरिपाच्या बहुतांशी पेरण्या येथे खोळंबल्या आहेत. पेरणीसाठी खरेदी केलेले बियाणे घरातच पडून आहेत. पावसाच्या भरवशावर विभागात क्वचित ठिकाणी पेरणी आणि टोकणीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत.
पावसाची चिंता मात्र त्यांच्यात कायम आहे. खरिपात पेरणीयोग्य पाऊस पडावा, यासाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेल्या महिन्यापासून पाऊस येण्याविषयी हवामान विभाग अंदाज वर्तवित आहे. मात्र, सर्व अंदाज फोल ठरत असल्याचे चित्र आहे.
कर्ज काढून आणलेली बियाणे घरातच
कर्ज काढून बियाणे खरेदी करावी लागली. देशाचा कणा म्हणून बळीराजाची ओळख आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ, तर दुसरीकडे पिकले तर बाजारात भाव नाही.अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी भरडला जात आहे. यंदा जून महिना संपत आला, मात्र अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीसाठी कर्ज काढून विकत आणलेली बियाणे हे घरात पडून आहेत.
चारा-पाण्याचा धसका
मृग नक्षत्र निघून गेले, आद्राही संपले, पुनर्वसु तरी पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरांच्या चारा-पाण्याचा धसका घेतला असून, देवा… आता अंत पाहू नको रे बाबा…’, असे विनवणी शेतकरी करीत आहेत.